Join us  

'होश वालों को खबर क्या....', जॉन मॅथ्यू बनवणार 'सरफरोश'चा दुसरा भाग

By संदीप आडनाईक | Published: January 19, 2021 7:24 PM

sarfarosh : देशांतर्गत समस्यांना सामोरे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना हा चित्रपट समर्पित असणार आहे.

ठळक मुद्देसरफरोश (१९९९) या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेला होता. या चित्रपटात आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसिरुद्दीन शाह यांनी प्रमुख भूमिका केली होती.

- संदीप आडनाईक

पणजी - इंडियन पॅनोरमाचे ज्युरी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध निर्माता जॉन मॅथ्यू माथन आपल्या गाजलेल्या सरफरोश चित्रपटाचा दुसरा भाग बनवणार असून त्याची पटकथा तयार आहे. देशांतर्गत समस्यांना सामोरे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना हा चित्रपट समर्पित असणार आहे.

गोव्यात सुरु असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोनशेहून अधिक चित्रपटांची निर्मिती केलेल्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता जॉन माथन यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या सरफरोश (१९९९) या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेला होता. या चित्रपटात आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसिरुद्दीन शाह यांनी प्रमुख भूमिका केली होती.

या सिनेमाच्या मध्यवर्ती संकल्पनेसाठी मी देशभर प्रवास केला आहे, असे सांगून मॅथ्यू म्हणाले, सामाजिक आणि राजकीय विचार समजून घेऊन निर्मात्यांनी चित्रपट बनवला पाहिजे. समाजाप्रती दिग्दर्शक सवेंदनशील असला पाहिजे. तुमचा मुद्दा कोणत्याही जड भाषेतून मांडण्याऐवजी कोणालाही सहज समजता यायला पाहिजे, असे मत मॅथ्यू यांनी मांडले.

डू यु हवं इट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या व्हर्च्युयल सवांद उपक्रमात सिनेपत्रकार फरीदून शहरयार यांनी जॉन यांची मुलाखत घेतली. सरफरोश या चित्रपटाची पटकथा स्वतः जॉन मॅथ्यू यांनी लिहिली होती. गाण्यासाठी योग्य जागा असली पाहिजे. जेव्हा हा सिनेमा तयार झाला, तेव्हा त्याच्या गाण्यांनी मोठे उत्पन्न दिले होते. या चित्रपटात रोमँटिक गाणी टाकण्यास माझा विरोध होता, पण तरीही दोन गाणी टाकली होती. या संदर्भात रोमँटिक गाणी हा मार्केटिंगच्या अंगाने गरजेचे नाही, असे माझे आजही मत आहे.

सरफरोशच्या सीक्वेल मध्ये गाणी कमीच असतील. 'होश वालों को खबर क्या' या गाजलेल्या गझलबद्दल बोलताना जॉन म्हणाले, या गाण्यातून प्रेमकथेसोबत दुहेरी संदेश दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तत्कालीन परिस्थितीवर ही गझल प्रकाश टाकते. सरफरोशच्या दुसऱ्या भागाच्या पटकथेविषयी बोलताना ते म्हणाले, या चित्रपटाची पटकथा फायनल करण्यापूर्वी मी ती पाच ते सहा वेळा बदललेली आहे. मी स्वतःच त्यांचे समीक्षण केलेलं आहे.

शिवाय तुमच्याकडे असे चांगले मित्र हवेत की ते तटस्थपणे समीक्षा करतील. पाच ते सहा महिन्यानंतर मी ती पुन्हा लिहिली,तेव्हा ती पूर्ण बदलली होती. आता अंतिम केलेली पटकथा पाचव्यांदा बदललेली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षा विषयक हा चित्रपट भाष्य करतो आहे. वेगवेगळ्या समस्यांवर देशाची अंतर्गत सुरक्षा किती भक्कम आहे हे सांगणारा हा सिनेमा असेल.  

टॅग्स :इफ्फीगोवाबॉलिवूड