Join us  

एका भेटीनंतर रजनीकांत यांचे पालटले नशीब, बनले सुपरस्टार; आधी करायचे बस कंडक्टर म्हणून काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 5:15 PM

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार  रजनीकांत आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करीत आहे. यावेळी चाहत्यांसह सेलिब्रेटीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत."प्रिय रजनीकांत जी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा." , रजनीकांत यांचा जन्म 1950 मध्ये बेंगळुरू येथे झाला होता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांची  सुपरस्टार होण्याची कहाणी खूपच प्रेरणादायक आहे.

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांची इमेज जरी एखाद्या ‘भगवान’ किंवा सुपरमॅनसारखी असली तरी त्यांची वास्तविक जीवनातील कथा या परिकथेच्या अगदीच विपरीत आहे. रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. चार भाऊ-बहिणींमध्ये रजनीकांत सर्वांत लहान आहेत. ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती खूप गंभीर होती. त्यामुळे लहानपणीच त्यांनी छोटे-मोठे कामं करण्यास सुरुवात केली. कारपेंटरपासून ते कुली बनण्यापर्यंत त्यांनी कामे केली.

मात्र अशातही त्यांचा लहानपणापासूनच चित्रपटांप्रती लगाव होता. ते शाळेत असताना नेहमीच नाटकांमध्ये सहभाग घ्यायचे. येथेच त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजनीकांतने बंगळुरू येथील एका ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यावेळी ते कन्नड रंगमंचावरही काम करू लागले. पुढे १९७३ मध्ये ते मद्रास फिल्ड इन्स्टिट्यूटशी जोडले गेले. याचदरम्यान ते इंडियन फिल्म दिग्दर्शक के. बालचंद्र यांच्या संपर्कात आले. त्यावेळी ते रजनीकांत यांना बघून खूपच प्रभावित झाले होते.

१९७५ मध्ये रजनीकांत आणि के. बालचंद्र यांची पहिली भेट झाली. तेव्हा बालचंद्र यांनी रजनी यांना एक छोटी भूमिका ऑफर केली. मात्र खरे यश त्यांना ‘भैरवी’ या चित्रपटातून मिळाले. कारण या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. पुढे रजनीकांत यांनी आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवत, संघर्ष सुरू ठेवला. १९७५ नंतर रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये ‘थलापती (१९९१), बाशा (१९९५) आणि पदायाप्पा (१९९९) हे त्यांचे त्याकाळातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहेत. या चित्रपटांनंतर ते केवळ अभिनेता राहिले नाहीत, तर लोकांसाठी आयकॉन बनले. त्यांचे चित्रपट आणि डायलॉग्स लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच एन्जॉय करू लागले.२००० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता रजनीकांत राजकारणात उतरणार असून, याठिकाणी त्यांचा प्रभाव दिसून येईल यात काहीही शंका नाही.

टॅग्स :रजनीकांत