Join us

आॅस्करसाठी निवडला जाणारा ‘न्यूटन’ ठरला ३०वा चित्रपट, यातील तीनच चित्रपटांना मिळाले नॉमिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:22 IST

भारतीय सिनेप्रेमींना आॅस्करने नेहमीच हुलकावणी दिली आहे. कारण आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाने फॉरेन कॅटेगिरीत अवॉर्ड जिंकला नाही. ही बाब ...

भारतीय सिनेप्रेमींना आॅस्करने नेहमीच हुलकावणी दिली आहे. कारण आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाने फॉरेन कॅटेगिरीत अवॉर्ड जिंकला नाही. ही बाब वेगळी आहे की, प्रत्येकवेळी भारतीय चित्रपटाची भारताकडून आॅस्करसाठी निवड होते; मात्र अखेरीस निराशाच हाती लागते. यावर्षी मराठमोळा तरु ण प्रयोगशील दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा ‘न्यूटन’ हा चित्रपट भारताकडून आॅस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे. ‘न्यूटन’ हा ३०वा भारतीय चित्रपट ठरला जो आॅस्करसाठी पाठविला जाणार आहे. या ३० चित्रपटापैकी फक्त तीनच असे चित्रपट आहेत, जे पुढे जाऊ शकले. इतर नॉमिनेशननंतरच पुरस्काराच्या रेसमधून बाहेर पडले. भारताकडून १९५७ मध्ये सर्वांत अगोदर ‘मदर इंडिया’ या चित्रपटाला अधिकृतरीत्या अकॅडमी अवॉर्ड्सकरिता पाठविण्यात आले होते. हा चित्रपट महबूब खान यांनी बनविला होता. या चित्रपटाला नॉमिनेशनदेखील मिळाले होते. मात्र चित्रपट आॅस्करच्या रेसमधून बाहेर पडला. या चित्रपटानंतर तब्बल १५ चित्रपट आॅस्करसाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील एकही चित्रपट आॅस्करच्या मुख्य रेसपर्यंत पोहोचू शकला नाही. मदर इंडिया (१९५७), मधुमती (१९५८) साहिब बीबी और गुलाम (१९६२), गाइड (१९६५), आम्रपाली (१९६६), आखिरी खत (१९६७), मजली दीदी (१९६८), रेश्मा और शेरा (१९७१), उपहार (१९७२), सौदागर (१९७३), मंथन (१९७७), शतरंज के खिलाडी (१९७८), पायल की झन्कार (१९८०), सारांश (१९८४), सागर (१९८५) असे या पंधरा चित्रपटांची नावे आहेत. पुढच्या टप्प्यात भारताकडून १९८८ मध्ये ‘सलाम बॉम्बे’ हा चित्रपट आॅस्करसाठी पाठविण्यात आला. हा चित्रपट मीरा नायर यांचा होता. या चित्रपटाने आॅस्करसाठी जबरदस्त फाइट दिली. कारण हा चित्रपट अखेरच्या क्षणापर्यंत पोहोचला होता. चित्रपट आॅस्कर आणेल अशी सर्व भारतीयांना अपेक्षा लागली होती. परंतु अखेरीस निराशाच पदरी पडली. यानंतर सहा अन्य हिंदी चित्रपट पाठविण्यात आले. मात्र त्यांनादेखील आॅस्कर आणता आला नाही. ‘सलाम बॉम्बे’सह परिंदा (१९८९), हिना (१९९१), रूदाली (१९९४), बॅण्डेट क्वीन (१९९९), राम तामिळ अणि हिंदी (२०००) असे सहा चित्रपट पाठविण्यात आले होते. मात्र यातील एकाही चित्रपटाला आॅस्करच्या रेसपर्यंत पोहोचता आले नाही. त्यानंतर ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ या दोन चित्रपटांनी आॅस्करसाठी चांगला लढा दिल्यानंतर आणखी एका चित्रपटाने या रेसमध्ये दम दाखविण्याचा प्रयत्न केला. तो चित्रपट बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याचा होता. होय, २००१ साली आलेल्या ‘लगान’ हा तिसरा असा चित्रपट होता, ज्याने आॅस्करच्या रेसमध्ये चांगली मजल मारली. नॉमिनेशनमध्ये स्थान मिळविलेला ‘लगान’ भारताला आॅस्कर मिळवून देईल असे प्रत्येकाला वाटत होते, परंतु हा चित्रपट आॅस्कर मिळवून देण्यात अपयशी ठरला. पुढे देवदास (२००२), रंग दे बसंती (२००६), एकलव्य : द रॉयल गार्ड (२००७), तारे जमीन पर (२००८), पीपली (२०१०), बर्फी (२०१२), लायर्स डाइस (२०१४) या चित्रपटांनीही आॅस्कर वारी केली. परंतु त्यांना अर्ध्यातूनच रिकाम्या हाताने परतावे लागले. आता ‘न्यूटन’ला आॅस्करच्या रेसमध्ये उतरविण्यात आले आहे. ‘न्यूटन’ची निवड होताच बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण असून, चित्रपटावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अभिनेता राजकुमार राव याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मासूरकर यांनी केले आहे. आता हा तरी चित्रपट तरी बॉलिवूडला आॅस्कर मिळवून देणार काय? याकडे संबंध भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. यावेळेस ९०व्या अकॅडमी अवॉर्डसचे आयोजन ४ मार्च २०१८ मध्ये लॉस एंजेलिस येथे करण्यात आले आहे.