Join us  

एका प्रश्नावर ट्विंकल खन्नाने म्हटले, ‘याचे उत्तर दिले तर माझ्या वैवाहिक जीवनात भूकंप येईल’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 9:23 AM

आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटावरून अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना या दाम्पत्याशी चर्चा केली असता अनेक मजेशीर गोष्टी समोर आल्या. वाचा सविस्तर!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचा आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यास यू-ट्यूबवर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण आतापर्यंत हा ट्रेलर २८ मिलियन वेळा बघण्यात आला आहे. चित्रपटाची कथा अरुणाचलम मुरुगनाथम नावाच्या अशा व्यक्तीवर आधारित आहे, ज्याने सॅनिटरी पॅड्स बनविण्याचे मिशन सुरू केले. या चित्रपटाचे नुकतेच ‘आज से तेरी’ हे गाणे रिलीज करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षयकुमार आणि चित्रपटाच्या निर्मात्या ट्विंकल खन्ना यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी चित्रपटासंबंधी अनेक गोष्टींचा उलगडा केला. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान एक गोष्ट अशी समोर आली, ज्यामधून अक्षयच्या चाहत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. होय, ट्विंकलच्या मते, या चित्रपटासाठी अक्षयकुमार तिची फर्स्ट च्वॉइस नव्हती. ट्विंकलने म्हटले की, ‘चित्रपटाचे दिग्दर्शक आ. बाल्की यांनीच मला सांगितले की, अक्षय चित्रपटासाठी योग्य अभिनेता ठरेल. मात्र सुरुवातीला माझी या चित्रपटासाठी अक्षय पहिली च्वॉइस नव्हता.’ पुढे जेव्हा ट्विंकलला अक्षय जर या चित्रपटासाठी तुझी फर्स्ट च्वॉइस नव्हता तर मग तो कोण अभिनेता होता ज्याला तू कास्ट करू इच्छित होती? असे विचारण्यात आले तेव्हा ट्विंकलने म्हटले की, ‘तुम्ही माझ्या वैवाहिक जीवनात भूकंप आणू इच्छिता काय? यावर लगेचच अक्षयने ट्विंकलची चेष्टा करताना म्हटले की, आता तू बोलून गेलीच आहेस त्यामुळे भूकंप तर अगोदरच आला आहे. पुढे ट्विंकलने सारवासारव करताना म्हटले की, अक्षयकुमारऐवजी दुसरा कोणीही अभिनेता अरुणाचलमची भूमिका साकारू शकत नाही. असो, या चित्रपटात अक्षयकुमार, राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्यावर्षी म्हणजेच २६ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ या चित्रपटाशी थेट फाइट होणार आहे. आता या दोन चित्रपटांमध्ये बाजी कोण मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना हे २००१ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. या दाम्पत्याला दोन मुले असून, मुलाचे नाव आरव आणि मुलीचे नाव नितारा आहे.