Join us  

नसीरूद्दीन शहा म्हणाले, मी देशभक्त हे ओरडून सांगण्याची गरज नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 3:22 PM

नसीरुद्दीन शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या रान माजले आहे. समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आणि त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले.

ठळक मुद्दे माझ्या चार पिढ्या या देशात जन्मल्या आहेत. माझा जन्म इथे झाला आहे. माझी मुलेही याच देशात जन्मली आहेत. माझे देशावर प्रेम आहे. पण म्हणून मला ते गळा फाडून सांगण्याची गरज नाही, असे नसीरूद्दीन म्हणाले.

नसीरुद्दीन शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या रान माजले आहे. समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आणि त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले. काहींनी नसीरूद्दीन यांची बाजू घेतली तर अनेकांनी नसीरुद्दीन यांच्यावर आगपाखड केली. अनुपम खेर यांनी तर शहा यांच्यावर थेट निशाणा साधला. तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला. या वादामुळे नसीरूद्दीन शहा अजमेर साहित्य महोत्सवात भाग घेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या महोत्सवात भाग घेतला. यावेळी त्यांनी आपले पुस्तक प्रकाशित केले. शिवाय या वादापुढची प्रतिक्रियाही नोंदवली. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, अजमेरपासून काही दूर अंतरावर पुष्कर येथे एका अज्ञात स्थळी नसीरूद्दीन यांच्यासाठी एक सेशन आयोजित केले गेले. येथे नसीर यांनी ‘नसीर का नजीर फिर एक दिन’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.हा देश माझाही आहे. पण मी देशभक्त आहे, हे मला ओरडून सांगण्याची गरज नाही. देशावर टीका करणे, माझ्यासाठीही वेदनादायी आहे. पण मला काही चुकीचे वाटत असेल तर मी बोलणारच. मी देशाच्या भविष्याबद्दल चिंतीत आहे. माझ्या चार पिढ्या या देशात जन्मल्या आहेत. माझा जन्म इथे झाला आहे. माझी मुलेही याच देशात जन्मली आहेत. माझे देशावर प्रेम आहे. पण म्हणून मला ते गळा फाडून सांगण्याची गरज नाही, असे नसीरूद्दीन म्हणाले.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर नसीरूद्दीन शहा यांनी भाष्य केले होते. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते. सध्या देशात गाईचा जीव माणसापेक्षा जास्त मौल्यवान झाला आहे. गाईचे प्राण पोलीस अधिका-यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरले आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरले आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल , अशा शब्दांमध्ये त्यांनी देशातील परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :नसिरुद्दीन शाह