Join us  

Lata Mangeshkar Birthday : अधुरी एक कहाणी !... म्हणून लतादीदींनी केले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 2:50 PM

Lata Mangeshkar Birthday : गानकोकिळा लता मंगशेकर यांचा आज 89 वा वाढदिवस. आपल्या सदाबहार गाण्यांनी त्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं.

गानकोकिळा लता मंगशेकर यांचा आज 89 वा वाढदिवस. आपल्या सदाबहार गाण्यांनी त्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सर्वांनाच ठाऊक आहेत. मात्र त्यांच्या प्रेम कहाणीबाबत खूपच कमी जणांना माहिती आहे. पहिलं प्रेम काही केल्या विसरता येत नाही, असे म्हणतात आणि याच कारणामुळे लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही, असंही म्हटलं जातं.  लता मंगेशकर यांचं डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रेम होते, असे म्हणतात. राज सिंह हे लता दीदींच्या भावाचे खूप जवळचे मित्र होते. जर लता मंगेशकर यांचे सिंह यांच्यासोबत लग्न झाले असते, तर दीदी एका राज्याच्या महाराणी बनल्या असत्या.     

लता दीदींनी आयुष्यात बरेच चढउतार पाहिले. आपल्या भाऊ-बहिणींना कधीही पालकांची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, यामुळे त्यांनी कधीही लग्न केले आहे, असे बोलले जाते.  पण खरं कारण वेगळे होते, असेही सांगितले जाते.

लता मंगेशकर यांचं डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रचंड प्रेम होते. हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह एकमेकांचे चांगले मित्र होते. ते एकत्र क्रिकेट खेळायचे. जेव्हा राजा कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले होते, तेव्हा त्यांची ओळख झाली. यादरम्यान, त्यांचे घरी येणे-जाणेदेखील वाढले होते. लता दीदी आणि राज सिंह यांच्यातही मैत्री वाढली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तोपर्यंत लता दीदींच्या नावाचाही मोठ्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश झाला होता.  मीडियामध्येही लता आणि राज यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली.  या दोघांनाही लग्न करायचं होते, मात्र ही गोष्ट सत्यात उतरू शकली नाही.

असे म्हटले जाते की, सर्वसामान्य घराण्यातील मुलीशी लग्न करणार नाही, असे वचन राज यांनी आपल्या आई-वडिलांना दिले होते. आयुष्याच्या शेवटापर्यंत राज यांनी हे वचन पाळलं आणि लता यांच्याप्रमाणेच ते आयुष्यभर अविवाहित राहिले. राज आणि लता दीदी यांच्यामध्ये 6 वर्षांचं अंतर होते. राज यांनी क्रिकेट खेळाची प्रचंड आवड होती. क्रिकेट प्रेमामुळे ते कित्येक वर्षे बीसीसीआयशी जोडले गेले होते. 

लता दीदींचं क्रिकेट प्रेम तर सर्वांनाच माहिती आहे.  राज आणि लता यांना एकत्र आणण्यात क्रिकेटचंही मोठं योगदान आहे. राज लता दीदींना प्रेमानं मिठ्ठू नावानं हाक मारायचे. त्यांच्या खिशामध्ये एक टेप रेकॉर्डर नियमित असायचा, यामध्ये लता दीदींच्या निवडक गाण्यांचा समावेश होता. जसा वेळ मिळायचा तसे ते लता यांनी गायलेली गाणी ऐकायचे. दरम्यान,12 सप्टेंबर 2009 रोजी राज सिंह यांचे निधन झाले. दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते, मात्र ही कहाणी अधुरीच राहिली.  

टॅग्स :लता मंगेशकरदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट