Join us  

कलंक या चित्रपटाची कथा आधारित आहे एका पुस्तकावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 3:16 PM

कलंक हा चित्रपट व्हॉट द बॉडी रिमेम्बर्स या पुस्तकावर आधारित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. 

ठळक मुद्दे‘कलंक’ चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहर यांना पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2004 च्या सुमारास सुचली होती असे करणने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण आता या चित्रपटाची कथा एका पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.

कलंक या चित्रपटाची करण जोहरने घोषणा केल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट दमदार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

कलंक’ चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहर यांना पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2004 च्या सुमारास सुचली होती असे करणने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण आता या चित्रपटाची कथा एका पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट व्हॉट द बॉडी रिमेम्बर्स या पुस्तकावर आधारित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. तसेच याबाबतचे वृत्त इन डॉट या वेबसाईटने दिले आहे. 

कलंक या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा काळ ४० च्या दशकातील असून सगळ्याच व्यक्तिरेखा एका वेगळ्या रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. करण जोहरने ६ मार्चला 'कलंक'चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. हा लूक पाहून या सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

कलंक या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळातील एका श्रीमंत कुटुंबाची कथा पाहायला मिळणार आहे. जातीय दंगली उसळत असतानाच आणि देशाची फाळणी होत असताना त्यांच्यात अनेक वर्षं लपवले गेलेली काही गुपितं बाहेर पडतात अशी चित्रपटाची कथा असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात देव, सत्या, रूप आणि जाफर या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. व्हॉट द बॉडी रिमेम्बर्स या पुस्तकात लेखक शौना सिंग बाल्दविन यांनी लिहिले आहे की, फाळणीच्या वेळात काही कारणामुळे दोन स्त्रियांना एकाच पुरुषाशी लग्न करावे लागते. पण त्या दोन्ही स्त्रियांमधले नाते खूपच क्लिष्ट असते आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी दरम्यान घडलेल्या गोष्टींमुळे त्या पुरुषालाच राहायला घर मिळणे कठीण जाते. या पुस्तकाच्या कथेत आणि चित्रपटाच्या कथेत काही साम्य आहेत अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. आलिया या चित्रपटात रूपच्या भूमिकेत असून तिचे लग्न देव म्हणजेच आदित्य रॉय कपूरसोबत झालेले आहे. सोनाक्षीच्या व्यक्तिरेखेचे नाव सत्या असून देवचे आडनाव आणि तिचे आडनाव सारखे असल्याची पोस्टरवरून कळत आहे. यावरून आदित्य आणि सोनाक्षी यांचे लग्न झाले असल्याचे तर्क लावले जात आहेत. 

 

लेखक शौना यांनी ट्वीटरवर रिप्लाय करत लिहिले आहे की, माझ्या प्रिय वाचकांनो, तुम्ही ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मी अद्याप चित्रपट पाहिला नसल्याने मी काहीही बोलू शकत नाही. माझ्या पुस्तकाचे कोणीही हक्क विकत घेतलेले नाहीत. पण या चित्रपटाची लीक झालेली कथा मी ऐकली आहे. त्यानुसार या चित्रपटाची कथा एकाच पुरुषासोबत लग्न झालेल्या दोन स्त्रियांची आहे असे मला वाटत नाहीये.  हे पुस्तक 1999 मध्ये प्रकाशित झाले होते. 

 

टॅग्स :कलंककरण जोहर