Join us  

आधी अभ्यास करा, मगच 5G लागू करा...! अभिनेत्री जुही चावलाने हायकोर्टात दाखल केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 1:25 PM

Juhi Chawla : मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये  जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देजुही चावलाच्या अधिकृत प्रवक्त्याने यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यामागचा हेतूही स्पष्ट केला. 

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) पर्यावरणवादी आहे. सोशल मीडियावरच्या तिच्या अनेक पोस्ट याचा पुरावा आहे. आता तिने थेट भारतात  5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज तिच्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये  जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता भारतात 5 G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. अशात या टेक्नॉलॉजीचे संभाव्य धोके बघता तिने यासाठी कायदेशीर मार्ग पत्करला आहे. (Juhi Chawla files suit against the implementation of 5G in India)

 5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता,जीव- जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी तिने संबंधित याचिकेत केली आहे.एबीपी न्यूजला तिने सांगितले की,  आमचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे, हेही मान्य  आहे. परंतु 5 Gसारख्या टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. आम्ही स्वत:चा रिसर्च केला तेव्हा आरएफ रेडिएशन आपल्यासाठी अतिशय घातक असल्याचे समोर आले आहे.

आपल्या देशात 5 G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी आरएफ रेडिएशनमुळे महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले, जनावरे जीव-जंतू, जंगल आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांचा योग्यरित्या संशोधन केले जावे आणि या संशोधनाचा अहवाल सार्वजनिक केला जावा. शिवाय यानंतरच 5 G  देशात लागू केली जावी, एवढीच आमची मागणी आहे.जुही चावलाच्या अधिकृत प्रवक्त्याने यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यामागचा हेतूही स्पष्ट केला. हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. या गंभीर मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधणे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. 5 जी टेक्नॉलॉजी आपल्या पर्यावरणासाठी किती सुरक्षित आहे हे त्यांनी सांगावे आणि नागरिकांची एकूणच निसर्गाचे आरोग्य लक्षात ठेवून निर्णय द्यावा, अशी आमची इच्छा आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

 

टॅग्स :जुही चावला