Join us  

Birthday Special: अशी सुरु झाली होती अमिताभ-जया यांची लव्हस्टोरी, या अटीमुळे घाईघाईत उरकले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 10:56 AM

जया बच्चन यांचा आज वाढदिवस

ठळक मुद्देघाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. 

 बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणा-या अभिनेत्री जया बच्चन यांचा आज (९ एप्रिल) वाढदिवस. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. 3 जून 1973 रोजी जया अमिताभ यांच्या झाल्यात. होय, दोघांनीही लग्न केले. अर्थात हे लग्न एका अटीमुळे झाले होते. आज याचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अमिताभ व जया यांची पहिली भेट ‘गुड्डी’च्या सेटवर झाली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी अमिताभ आणि जया यांची भेट घालून दिली होती. अमिताभ पहिल्याच नजरेत जया यांच्या प्रेमात पडले होते. पण जया यांना अमिताभ जराही आवडले नव्हते. अर्थात नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

यानंतर ‘बावर्ची’च्या सेटवर अमिताभ व जया यांचे प्रेम बहरले. या चित्रपटात जया व राजेश खन्ना लीड रोलमध्ये होते. पण अमिताभ यांना जया यांचा दुरावा सहन होईना. ते रोज ‘बावर्ची’च्या सेटवर जया यांना भेटायला जात.

1973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ‘जंजीर’ हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे दोघेही होते.

‘जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली. तत्पूर्वी पिता हरिवंशराय यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला आणि जया यांचे नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. जयासोबत जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊ देणार नाही, असे हरिवंशराय म्हणाले. अमिताभ पित्याचे शब्द टाळू शकत नव्हते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग काय घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. यानंतर दुस-याच दिवशी जया व अमिताभ लंडनसाठी रवाना झालेत.

   

टॅग्स :जया बच्चनअमिताभ बच्चन