Join us  

व्हॅकेशनदरम्यान प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या-आयुष्यमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 6:33 PM

Ayushmann Khurrana incredible trip to the Northeast: या सफरीमध्ये मी निसर्गाचे सौंदर्य अनुभवले, लोकांचे प्रेम मिळाले, आपल्या देशाचा वैविध्यता ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी एक स्पेशल अनुभव होता आणि या सहलीमुळे मला आपल्या सुंदर देशाच्या सौंदर्याचे दर्शन घडले.”

आयुषमान खुराना नुकताच ईशान्य भारताच्या सफरीवरून मुंबईत परतला आहे आणि येताना आयुष्यभरासाठीच्या आठवणी घेऊन आला आहे. त्याला पुन्हा एकदा निसर्गसुंदर ईशान्य भारतात जायची ओढ लागली आहे. ती जागा आणि तेथील माणसांनी त्याच्यावर कायमस्वरुपी ठसा उमटवला आहे.

आयुषमान म्हणतो, “मला नेहमीच अशा ठिकाणी जायला आवडते. ईशान्य भारताच्या माझ्या सफरीने मला खरच वेगळाच अनुभव मिळाला आहे. या सफरीमध्ये मी निसर्गाचे सौंदर्य अनुभवले, लोकांचे प्रेम मिळाले, आपल्या देशाचा वैविध्यता ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी एक स्पेशल अनुभव होता आणि या सहलीमुळे मला आपल्या सुंदर देशाच्या सौंदर्याचे दर्शन घडले.”

तो पुढे म्हणतो, “ईशान्य भारताचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. आम्ही ईशान्य भारतात चित्रीकरण केल्याचा मला आनंद आहे कारण त्यामुळे मला आपला देश किती अतुलनीय आहे ते समजले.” ईशान्य भारतात केलेली सफर आणि ‘अनेक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दल आयुषमान म्हणतो, “मी पुन्हा कधी ईशान्य भारतात जाईन, असे वाटत आहे, कारण मी मुंबईत येताना तिथल्या अनेक आठवणी घेऊन आलो आहे. आम्ही ‘अनेक’चे चित्रीकरण तेथे सुरळीतपणे पार पाडू शकलो, याचे मला समाधान आहे. मी पहिल्यांदाच ईशान्य भारतात चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो आणि तेथील प्रेमळ लोकांकडून इतके प्रेम लाभेल याची कल्पनासुद्धा मी केली नव्हती.”

तो पुढे म्हणतो, “ईशान्य भारतातील मुलांकडून जे प्रेम मिळाले, त्याला तोड नाही. त्यांना भेटणे आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडून जाणे, हे खरंच खूप स्पेशल होते. त्याचप्रमाणे मी माझ्या कुटुंबियांनाही तिथे बोलवून घेतले, त्यांच्यासोबत वेळ घालवता आला आणि आम्ही काझीरंगाची सफर केली आणि खूप सुंदर आठवणी गोळा गेल्या. ती सहल खूपच खास होती आणि या प्रसन्न, ताजेतवाने करणाऱ्या व्हेकेशनमधील प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेतला.”

आयुषमानने आसाममधील अत्यंत लोकप्रिय असा लाल सा (लाल चहा) चाखला आणि तो त्याचा मोठा फॅन झाला. तो म्हणतो, “मला लाल सा चा (लाल चहा) शोध लागला आणि मला तो प्रचंड आवडला. मी दररोज सेटवर असताना लाल सा पित असे आणि तो घरीसुद्धा घेऊन आलो आहे. आसामचा एक छोटासा तुकडा घरी घेऊन आल्यासारखे मला वाटले. जेव्हा मला ईशान्य भारताची आठवण येते, आणि ती मला रोजच येते, तेव्हा मी स्वतःसाठी लाल सा तयार करतो आणि तिथल्या सुंदर आठवणींना उजाळा देतो.”

ईशान्य भारतात पुन्हा एकदा लवकर भेट देता येईल, अशी या स्टारला आशा आहे. “ईशान्य भारताचा विचारही मला नॉस्टॅल्जिक करतो आणि मला पुन्हा त्या दिशेला कूच करण्याचा इशारा देतो. माझ्या वेळापत्रकाने मला परवानगी दिली तर मी लवकरात लवकर तिथे पुन्हा एकदा जाऊन येईन, अशी मला आशा आहे.”

 

टॅग्स :आयुषमान खुराणा