Join us  

हे काही लोकांचे कटकारस्थान! ‘रंगीला राजा’ गोविंदाचे  गंभीर आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 11:19 AM

होय, काही लोक माझ्याविरोधात कट रचत असून माझा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप गोविंदाने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा आगामी चित्रपट ‘रंगीला राजा’ सध्या अडचणीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने अलीकडे या चित्रपटात २० कट्स सुचवलेत. यानंतर ‘रंगीला राजा’चे निर्माते पहलाज निहलानी यांनी कोर्टात धाव घेतली. केवळ इतकेच नाही तर सेन्सॉर बोर्डावरही त्यांनी आगपाखड केली. आता गोविंदानेही या  पार्श्वभूमीवर काही गंभीर आरोप केले आहेत. होय, काही लोक माझ्याविरोधात कट रचत असून माझा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप गोविंदाने केला आहे.एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गोविंदाने हे आरोप केलेत. गेल्या ९ वर्षांपासून माझ्यासोबत हे सगळे घडत आहे. लोकांचा एक गट माझ्याविरोधात कटकारस्थान रचतो आहे. माझ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या मार्गात अडथळे निर्माण केले जात आहेत. कधी माझ्या चित्रपटाला चांगली रिलीज मिळत नाही तर कधी चांगले थिएटर. अलीकडे माझा ‘फ्रायडे’ रिलीज झाला. माझ्या त्या चित्रपटाला ना चांगले थिएटर मिळाले, ना चांगले रिव्ह्यू मिळालेत. तेव्हा मी शांत बसलो. पण आता पहलाज निहलानी यांच्यासारख्या उत्तम निर्मात्याच्या चित्रपटाबद्दलही हेच होताना दिसत आहेत. पहलाज इंडस्ट्रीचे दिग्गज निर्माते आहेत. त्यांनी अनेक दिग्गज स्टार्ससोबत चित्रपट बनवले आहेत. ही फिल्म इंडस्ट्री कधीच अशी नव्हती. अलीकडे आपण कुण्या वेगळ्याचं जगात राहतोय, असे मला वाटू लागले आहे, असे गोविंदा यावेळी म्हणाला.अर्थात हे कटकारस्थान रचणारे लोक कोण, हे गोविंदाने सांगितले नाही. त्यामुळे त्यांचा इशारा कुणाकडे होता, हे नक्की सांगता येणार नाही.  ‘रंगीला राजा’ या चित्रपटात गोविंदाने विजय माल्याची भूमिका साकारली आहे. तीन नट्या याद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. गोविंदा आणि निहलानी यांनी ३१ वर्षांपूर्वी ‘इल्जाम’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.

टॅग्स :गोविंदा