Join us  

‘त्या’ भांडणाने बदलले होते आयुष्य; आता सात वर्षांनंतर कमबॅक करणार शिरीष कुंदर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:09 PM

शाहरूख खान आणि फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्या ७ वर्षांपूर्वी झालेले भांडण कुणाला ठाऊक नाही. सात वर्षांपूर्वीच्या या भांडणाने शाहरूखच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण शिरीष कुंदर याचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदलले.

ठळक मुद्दे ‘अग्निपथ’च्या पार्टीत शिरीषने पुन्हा ‘रा-वन’ची थट्टा करताच शाहरुखचा राग अनावर झाला होता आणि रागाच्या भरात त्याने शिरीषच्या कानशिलात लगावली होती.

शाहरूख खान आणि फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्या ७ वर्षांपूर्वी झालेले भांडण कुणाला ठाऊक नाही. सात वर्षांपूर्वीच्या या भांडणाने शाहरूखच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण शिरीष कुंदर याचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदलले. या घटनेनंतर शिरीष एकप्रकारे बॉलिवूडमधून गायब झाला. ना कुण्या पार्टीत, ना कुठल्या इव्हेंटमध्ये तो दिसला. इंडस्ट्रीतील लोकांना जणू तो टाळू लागला. पण शेवटी टाळून टाळून किती टाळणार? सात वर्षानंतर का होईना शिरीष आता इंडस्ट्रीत कमबॅक करतोय.

होय, शिरीष कुंदर आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झालाय. नेटफ्लिक्सचा ओरिजनलचा एक चित्रपट शिरीष दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि मनोज वाजपेयी लीड रोलमध्ये असल्याचे कळतेय. येत्या जूनमध्ये मुंबईआणि नैनीताल येथे या चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे. साहजिकच शिरीष सध्या उत्साहात आहे. त्याची पत्नी फराह खान ही सुद्धा जाम आनंदात आहे. शिरीष दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘मिसेस सीरिअल किलर’ असेल.

सुमारे सात वर्षांपूर्वी ‘अग्निपथ’ला मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दिलेल्या पार्टीत संजय दत्तने शाहरुख खान आणि शिरीष कुंदर या दोघांनाही आमंत्रित केले होते. ‘रा-वन’ सिनेमावरून शिरीषने केलेल्या कमेंट्समुळे शाहरुख खान आधीच त्याच्यावर नाराज झाला होता. अशातच ‘अग्निपथ’च्या पार्टीत शिरीषने पुन्हा ‘रा-वन’ची थट्टा करताच शाहरुखचा राग अनावर झाला होता आणि रागाच्या भरात त्याने शिरीषच्या कानशिलात लगावली होती. संजय दत्तने मध्यस्थी करून दोघांना शांत केले होते. अर्थात शाहरुख खानने, मी त्या पार्टीत नव्हतोच. त्यामुळे भांडण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे वृत्त खोटे आहे, असे म्हटले होते. 

टॅग्स :फराह खानशाहरुख खाननेटफ्लिक्स