Join us  

मनोरंजन क्षेत्राला पॅकेजमध्ये स्थान नाही, कलाकरांकडून वाढतेय नाराजी

By अजय परचुरे | Published: May 20, 2020 3:02 PM

सरकारला सर्वाधिक कर मनोरंजन क्षेत्राकडून मिळतो मात्र अश्या बिकट परिस्थितीत इतर क्षेत्रांबरोबरच मनोरंजन क्षेत्राकडेही लक्ष देण्याची सरकारडून गरज आहे अशी भावना प्रत्येक कलाकाराची आहे.

ठळक मुद्देतोकड्या मदतीवर किती दिवस ढकलणार. आम्ही खबरदारी घेऊ पण शूटींग सुरू करा

लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचेही चित्रिकरण बंद पडलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कलाकारांचं,तंत्रज्ञांचं मोठं नुकसान झालं आहे. या क्षेत्रातील हजारो कलाकाराचं,तंत्रज्ञांचं हातावरती पोट आहे. त्यामुळे अशा लोकांना आता सरकारी पातळीवरची मदत अपेक्षित आहे आणि ती रास्तही आहे. लॉकडाऊन कधी संपेल आणि शूटींग कधी सुरू होईल याची निश्चित शाश्वती कोणीच देऊ शकत नाहीये. त्यामुळे हे सर्व कधी स्थिरस्थावर होईल आणि आपल्याला काम मिळेल याकडे आता या सर्व मनोरंजन क्षेत्रातील मंडळींचं लक्ष लागलंय. केंद्राने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये मनोरंजन क्षेत्राला एकही रूपया देण्यात आलेला नाही, ह्याचा आता मनोरंजन क्षेत्राकडून तीव्र शब्दात निषेध होतोय. सरकारला सर्वाधिक कर मनोरंजन क्षेत्राकडून मिळतो मात्र अश्या बिकट परिस्थितीत इतर क्षेत्रांबरोबरच मनोरंजन क्षेत्राकडेही लक्ष देण्याची सरकारडून गरज आहे अशी भावना प्रत्येक कलाकाराची आहे. आम्हांला ही आपलं म्हणा असा सूर आता मनोरंजन विश्वाकडून येतो आहे. 

मनोरंजन विश्वाबद्दल चुकीचे समजलॉकडाऊनचा आणि मनोरंजन विश्वाला फटका , यांच्याकडे बराच पैसा असतो , यांना कसली कमी आहे तरीही रडतायेत ,असा चुकीचा समज सोशल मिडियावरून मनोरंजन विश्वाबद्दल लॉकडाऊनच्या या २ महिन्यात करण्यात आलेला आहे. या क्षेत्राची माहिती नसणाऱ्या किंवा समज नसणाऱ्या व्यक्ती जाणूनबुजून ही माहिती सोशल मिडियावर पसरवत आहेत. मुळात मनोरंजन विश्वाला या लॉकडाऊनचा जबरदस्त फटका पडला आहे. चित्रपटगृहे,नाटयगृहे , छोट्या पडद्यावरील मालिका ,रियालीटी शो, वेब सिरीजचं शूटींग,जाहिरातीचं शूटींग असं सर्व प्रकारचं शूटींग गेले २ महिने पूर्णपणे बंद आहे. यापूर्वी असं कोणतंच शूटींग इतक्या दिवसांसाठी बंद करण्यात आलं नव्हतं. बरं इतर क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रात वर्क फ्रॉम होम असं काहीच नाही. त्यामुळे कलाकार,तंत्रज्ञ मंडळी गेले दोन महिने पूर्णपणे कामविरहीत नुसती बसली आहेत. शूटींगची परवानगी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही माणसं काहीएक करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट यातील बरेच कलाकार,तंज्ञत्र, बॅकस्टेज आर्टिस्ट, लाईटमन,मेकअपमन,ज्युनियर आर्टिस्ट, फाईटमास्टर,स्टंटमॅन, गायक, संगीतकार ह्यांच्याकडे गेले २ महिने काहीही घडत नसल्याने एक रूपयाचीही कमाई नाही. मनोरंजन क्षेत्र ही कोणतीही सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी नसल्याने तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये किती दिवस,किती तास काम करता त्याच्यावर ह्या सर्व कलाकार,तंत्रज्ञ मंडळींना त्यांची रोजीरोटी,मानधन मिळत असतं आणि ते त्याचं घर चालवत असतात. कोणत्याही कामाचे पैसै हे लगेच मिळतील याची शाश्वती नसते. काही वाहिन्या, निर्माते काम झाल्यावर दोन महिन्यांनी ,तीन महिन्यांनीही किंवा करारात म्हटल्याप्रमाणे मानधनाचा चेक देत असतात. दोन महिन्यांच्या या कोरोना सुट्टीमुळे असं कोणतंही काम किंवा कोणतंही शूटींग नसल्याने ही हजारो मंडळी आता ताणात आली आहेत. पुढे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. 

तोकड्या मदतीवर किती दिवस ढकलणार. लॉकडाऊन कधी संपेल आणि आपल्याला पुन्हा कधी काम करायची संधी मिळेल याबद्दल कलाकार मंडळी साशंक आहेत. दुसरी गोष्ट लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात या मंडळींनी कशीबशी आपली गुजराण केली. कलाकार मंडळी, अनेक संस्था, सिनेमा फेडरेशन ,रंगमंच कामगार यांनी आपपाल्या परीने जेवढी मदत करता आली ती आपपाल्या कामगारांसाठी ,गरजू कलाकारांसाठी केलीही खरी पण ही मदतही आता तोकडी पडू लागली आहे. या संस्था किती कालावधीपर्यंत ही मदत करतील त्यांच्याही काही मर्यादा आहेत. त्यामुळे सरकारने इतर क्षेत्रांप्रमाणे या अवाढव्य पसरलेल्या मनोरंजन क्षेत्रालाही आपलं म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक निर्माते हवालदिल झालेत, अनेकांच्या डोक्यावर कर्जाची टांगती तलवार आहे. या कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत आहे. अश्यावेळी इतर क्षेत्रांप्रमाणे सरकारने मनोरंजन क्षेत्रातील लोकांचं पालकत्व घेण्याची गरज असल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे. अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून यावरती लिहीलंही आहे. मात्र तरीही सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.  

आम्ही खबरदारी घेऊ पण शूटींग सुरू कराहा कालावधी जसाजसा वाढत चालला आहे . तसंतसं हातावर पोट असणाºया या मनोरंजन विश्वातील हजारो लोकांची चलबिचल आता वाढत चालली आहे. या दोन महिन्यात सरकारने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन मनोरंजन विश्वातील प्रत्येकाने पाळलं आहे. चित्रपटसृष्टीतील संस्थांनी एकत्र येऊन,शूटींग दरम्यान योग्य ती खबरदारी घेऊ ,सॅनॅटायझर,मास्क या सगळ्यांचा योग्य तो वापर करू , प्रत्येक सेटवर डॉक्टर तैनात ठेवू अश्या प्रकारच्या मागण्या करत सरकारला शूटींग चालू करण्याविषयी एक पत्र लिहीलं आहे. पण त्याआधीच सरकारची जबाबदारी आहे की हजारो लोकांना हक्काची रोजी रोटी देणाऱ्या या मनोरंजन विश्वाला बजेटमध्ये स्थान देण्याची आणि त्यांना आपलं म्हणण्याची..  

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबॉलिवूड