Join us  

असा दिसतो दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचा सावत्र मुलगा, लाईमलाइटपासून राहतो दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:12 PM

साजिद आणि दिव्या यांनी अतिशय साधेपणाने केवळ काही लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते.

सध्या सर्वत्रच स्टारकिडसची सर्वात जास्त चर्चा पाहायला मिळते. बघावे तिथे स्टारकिडसच धुमाकुळ घालताना पाहायला मिळतात. अशातच एका स्टारकिडने सर्वाचे लक्ष वेधले आहे. हा स्टारकिडस इतरांपेक्षाही खास आहे. कारण हा आहे दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचा सावत्र मुलगा. होय, वाचून तुम्हालाही थोडा आश्चर्याचा धक्काच बसला असणार फोटोत दिसणारा मुलगा हा दिव्या भारतीचा सावत्र मुलगा आहे. दिव्या भारतीच्या निधनानंतर दिव्या भारतीचा पती निर्माता साजिद नाडियाडवालाने वर्धा खानसोबत दुसरे लग्न करत आपला संसार थाटला. 

दिव्या भारती आणि साजिद यांच्या नात्याने नियतीने तर साथ नाही दिली. मात्र साजिद आणि वर्धा खान यांचा गुण्या गोविंदाने संसार सुरू आहे. साजिद आणि वर्धा यांना दोन मुले आहेत. सुभान आणि सुफियान अशी दोन्ही मुलांची नावं आहेत. यात सुभान हा साजिद आणि वर्धा यांचा मोठा मुलगा आहे. सुभान लूक्समध्ये खूपच हँडसम असून त्याला पाहताच भले भलेही त्याच्यावर फिदा नाही झाले तर नवलच.

सुभान हा आजच्या बॉलिवूडच्या हिरोंनाही टक्कर देतो इतका तो हँडसम दिसतो. सध्या सगळेच स्टारकिडस लाईमलाइटमध्ये असताना साजिदने मात्र त्यांच्या मुलांना प्रकाशझोतापासून दोन हात लांबच ठेवले आहे. कधीच साजिद आणि कुटुंबियांना एकत्र फिरताना पाहण्यात आले नाही. खूप कमी वेळा हे कुटुंब एकत्र मीडियाच्या कॅमे-यात कैद होतात. त्यापैकीच हा दुर्मिळ फोटो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मुळात दिव्या भारतीने एंट्री केली तेव्हा त्याच काळात अनेक अभिनेत्री यशशिखरावर होत्या. असं असतानाही दिव्या भारतीने मात्र आपल्या अदा आणि सौंदर्यानं त्यावेळच्या प्रस्थापित अभिनेत्रींना कडवी टक्कर दिली होती. तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. मात्र नियतीच्या मनात काही औरच होते. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले. दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. दिव्या भारतीच्या मृत्यूचे कारण आजही गुढच आहे.

विशेष म्हणजे दिव्या आणि साजिद या दोघांची लव्हस्टोरी अतिशय रंजक आहे. 'शोला और शबनम' या चित्रपटाच्या सेटवर दिव्या आणि साजिद यांची पहिली भेट झाली होती. साजिद आणि गोविंदा खूप चांगले फ्रेंड्स होते. गोविंदाला भेटण्यासाठी साजिद शोला और शबनमच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिव्या आणि साजिदची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झाले.

साजिद आणि दिव्या यांनी अतिशय साधेपणाने केवळ काही लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. लग्नात दिव्याची मैत्रीण संध्या, तिचा नवरा यांसारखे काहीच लोक हजर होते. साजिद मु्स्लिम असल्याने तिने लग्न करण्यासाठी धर्मही स्वीकारला होता. तिने तिचे नाव बदलून सना नाडियाडवाला असे ठेवले होते.

टॅग्स :दिव्या भारतीसाजिद नाडियाडवाला