Join us  

‘या’ एका विचित्र व दुर्दैवी योगायोगामुळे संजीव कुमार आजन्म अविवाहित राहिले...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 7:00 AM

Sanjeev Kumar's Birth Anniversary : संजीव कुमार अनेकदा प्रेमात पडले. पण त्यांनी कधीच लग्न केले नाही. एका विचित्र योगायोगामुळे ते आजन्म अविवाहित राहिले.

ठळक मुद्देआपल्या फिल्मी करिअरमध्ये संजीव कुमार यांनी अनेक लहान भूमिका केल्यात. कुठलीही भूमिका स्वीकारताना ते घाबरले नाहीत.

बॉलिवूडचा ठाकूर म्हणजेच  अष्टपैलू कलाकार संजीव कुमार.संजीव कुमार (Sanjeev Kumar ) आज आपल्यात नाहीत. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज संजीव कुमार आठवण्याचे कारण म्हणजे, १९३८ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे ९ जुलैला त्यांचा जन्म झाला होता. आज त्यांचा वाढदिवस. (Sanjeev Kumar's Birth Anniversary )

संजीव कुमार यांचे खरे नाव हरीभाई जरीवाला होते. ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका साकारल्या होत्या. ‘कोशिश’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली मूक व कर्ण बधिर व्यक्तीची भूमिकाही गाजली होती.

संजीव कुमार अनेकदा प्रेमात पडले. पण त्यांनी कधीच लग्न केले नाही. एका विचित्र योगायोगामुळे ते आजन्म अविवाहित राहिले. होय, त्यांनी लग्न न करण्यामागे एक खास कारण होते.  त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा दहा वर्षांचा झाला की, त्याच्या वडिलांचा मृत्यू होत असे. हा योगायोग होता की अंधश्रद्धा ते ठाऊक नाही. पण संजीव कुमार यांच्या वडिलांसोबत आणि भावासोबत हेच घडले होते. संजीव कुमार जेव्हा १० वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडिलही अशाचप्रकारे त्यांचा मुलगा दहा वर्षांचा झाल्यावर गेले होते. संजीव कुमार यांच्या दोन भावांसोबतही हेच घडले होते. संजीव कुमार यांच्या मनात ही भीती घर करून बसली होती. असे म्हणतात की, त्यामुळे संजीव कुमार यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले होते. पण हा दत्तक पुत्र १० वर्षांचा होताच, दुर्दैवाने संजीव कुमार यांचाही मृत्यू झाला.

संजीव कुमार यांनी लग्न न करण्यामागे आणखी एक कारण सांगितले जाते. होय, असे म्हणतात की, ज्या महिलांसोबत संजीव यांचे अफेअर राहिले  त्या सर्वांवर त्यांचा कधीच पूर्ण विश्वास नव्हता. त्या सगळ्या माझ्यावर नाही तर माझ्याा पैशांवर प्रेम करतात, असेच त्यांना वाटायचे. या एका कारणामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही़. 

मृत्यूची भीती त्यांना कायम छळायची.  मी लवकर जाणार, असे ते आपल्या जवळच्यांना नेहमी म्हणत आणि झालेही तसेच. वयाच्या ४७ व्या वर्षी ते सर्वांना सोडून गेलेत.

आपल्या फिल्मी करिअरमध्ये संजीव कुमार यांनी अनेक लहान भूमिका केल्यात. कुठलीही भूमिका स्वीकारताना ते घाबरले नाहीत. त्याचमुळे कधीकाळी जया बच्चन यांच्या प्रियकराची, पतीची भूमिका साकारणा-या संजीव कुमार यांनी पुढे जया यांच्या सास-यांची आणि वडिलांचीही भूमिका साकारली.  ‘त्रिशूल’ या चित्रपटात संजीव कुमार यांना अमिताभ व शशी कपूर या समकालीन अभिनेत्यांच्या पित्याची भूमिका ऑफर  झाली. संजीव कुमार यांनी तीही स्वीकारली.  वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी एका वृद्धाची भूमिका साकारली होती. त्यांना त्या भूमिकेत पाहून पृथ्वीराज कपूर दंग झाले होते.

टॅग्स :संजीव कुमार