Join us  

घटस्फोट घोषणेच्या २४ तासात आमिर खान आणि किरण रावचं एकत्र FB लाईव्ह; मराठीतून साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 3:06 PM

आमिर खान आणि किरण रावनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोघंही वैवाहिक नातं संपुष्टात आणत असले तरी व्यावसायिक नातं कायम राहील असं म्हटलं आहे.

ठळक मुद्देपानी फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’या उपक्रमात दोघांनीही हजेरी लावली होती.सोयाबीनच्या शेतीबाबत असणारे प्रश्न या लाईव्हच्या माध्यमातून विचारण्यात आले. त्याला तज्ज्ञांनीही उत्तरं दिली. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे

मुंबई – बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी शनिवारी संयुक्त निवेदन काढत दोघंही वेगळं होत असल्याची घोषणा केली आहे. आमिर आणि किरण राव यांनी १५ वर्षाच्या संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरणच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. या दोघांनीही पुढील आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे.

परंतु आमिर खान आणि किरण रावनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोघंही वैवाहिक नातं संपुष्टात आणत असले तरी व्यावसायिक नातं कायम राहील असं म्हटलं आहे. त्यानुसार, चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजक्टमध्ये आमिर आणि किरण एकत्रित काम करत असल्याचं स्पष्ट केले आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या घोषणेला २४ तास होत नाही तोवर आमिर खान आणि किरण राव यांनी एकत्रित येत फेसबुक लाईव्ह केले आहे. पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’या उपक्रमात दोघांनीही हजेरी लावली होती.

या फेसबुक लाईव्हमध्ये आमिर खान, किरण राव यांच्यासोबतच दिग्दर्शक सत्यजीत भटकळ, डीएल मोहिते, डॉ. आरएस जाधव, विलास शिंदे यांनी सहभाग घेतला होता. काही मराठी शेतकरीही या लाईव्हमध्ये सहभागी होते. सोयाबीनच्या शेतीबाबत असणारे प्रश्न या लाईव्हच्या माध्यमातून विचारण्यात आले. त्याला तज्ज्ञांनीही उत्तरं दिली. यावेळी आमिर खान आणि किरण राव यांनी विलास शिंदे यांच्या कामापासून खूप प्रेरित असल्याचं म्हटलं. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमिरनं किरण रावसोबत व्यावसायिक संबंध कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.

संयुक्त निवेदनात आमिर खान आणि किरण रावनं काय म्हटलं?

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. नुकतेच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. किरण रावसह आमीर खानचे दुसरे लग्न होते, घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे. "आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. आमच्या प्रमाणेच, आमच्या हितचिंतकांनीही या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट झाला अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा.

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान घातलं होतं. करपलेली पिकं, कोरडा दुष्काळ, पिण्यासही पाणी नाही अशा विविध समस्यांचा सामना राज्यातील जनतेला करावा लागत होता. अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांनी हीच समस्या ओळखून या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. अमीर खाननं राज्यातील गावोगावी जाऊन गावकऱ्यांना एकत्रित करून बदल घडवून आणण्याचा चमत्कार केला. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून अमीर खान, किरण राव यांच्या टीमने राज्यात जलक्रांती घडवण्याचं काम हाती घेतलं. लोकं मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन एक चळवळ उभी राहिली.

टॅग्स :आमिर खानकिरण राव