Join us  

सिनेमे नव्हते, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता; अमिताभ हताश झाले अन् यश चोप्रांच्या घरी पोहोचले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 5:54 PM

सकाळी सकाळी अमिताभ यश चोप्रांच्या घरी पोहोचलेत आणि त्यांना काम देण्याची विनंती केली...

ठळक मुद्दे‘मोहब्बतें’ने गाडी रूळावर आली होती. पण स्थिती इतक्यात सावरणार नव्हतीच. अशावेळी अमिताभ यांना ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करण्याची संधी मिळाली.

संघर्षाचेच दुसरे नाव म्हणजे आयुष्य. हा संघर्ष भल्याभल्यांना चुकला नाही. अगदी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्या वाट्यालाही मोठा संघर्ष आला. आज ऐश्वर्य अमिताभ यांच्या पायाशी लोळण घालते. पण एकेकाळी हेच अमिताभ दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचले होते. अगदी लोकांना काम मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. एबीसीएल नावाने सुरू केलेली कंपनीही पुरती डुबली होती. डोक्यावर भलामोठा कर्जाचा डोंगर होता आणि त्यामुळे घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती. परिस्थिती इतकी वाईट होती की, अभिषेकचे विदेशातील शिक्षण झेपत नव्हते म्हणून त्यालाही शिक्षण सोडून मायदेशी परतावे लागले होते. अभिषेक नाईलाजाने परदेशातून घरी परतला. वडिलांची चिंता त्याला कळत होती. पण तो फार काही करू शकत नव्हता. पण तरीही त्याने शक्य तो हातभार लावला. अगदी कंपनीत प्रॉडक्शन बॉय म्हणून त्याने काम केले.

एक दिवस अभिषेकला बोलावले आणि़...त्या रात्री अमिताभ यांनी अभिषेकला आपल्या जवळ बोलावले आणि मनातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्यात. चित्रपट चालत नाहीयेत, बिझनेस बुडाला आहे. काहीही ठीक नाही. पण आता मी ठरवलेय, मी फक्त अभिनयावरच लक्ष केंद्रीत करणार, असे अमिताभ यांनी अभिषेकला सांगितले आणि त्याचक्षणी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.

दुस-या दिवशी सकाळी यश चोप्रांच्या घरी पोहोचले...दुस-या दिवशी सकाळी सकाळी अमिताभ यश चोप्रांच्या (Yash Chopra)घरी पोहोचलेत आणि त्यांना काम देण्याची विनंती केली. माझ्याकडे काम नाही. मला सध्या कोणीही काम देत नाहीये. कृपा करून माझी मदत करा, मला काम द्या. एक तरी सिनेमा द्या, अशी गयावया त्यांनी केली. खरे तर त्यावेळी अमिताभ  हिरो म्हणून कोणत्याच सिनेमात फिट होणार नव्हते. अनेक नव्या दमाच्या हिरोंची चलती होती. पण अमिताभ यांच्या शब्दाला मान देॅऊन यश चोप्रा यांनी बिग बींसाठी ‘मोहब्बतें’ बनवला. या सिनेमात अमिताभ यांच्यासह शाहरूख खान, ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, शमिता शेट्टी, किम शर्मा असे अनेक कलाकार होते. पण या चित्रपटातील बिग बींची भूमिका खूप महत्वाची होती. स्क्रिप्ट वाचताच बच्चन यांनी होकार भरला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना चांगल्या कामाच्या आॅफर येऊ लागल्या आणि बच्चन कुटुंबाचे आयुष्य रुळावर आले.  

कौन बनेगा करोडपतीने सावरले...‘मोहब्बतें’ने गाडी रूळावर आली होती. पण स्थिती इतक्यात सावरणार नव्हतीच. अशावेळी अमिताभ यांना ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करण्याची संधी मिळाली.  हा शो करू नको असा सल्ला अनेकांनी अमिताभ यांना दिला. कारण, त्यावेळी मोठ्या पडद्यावरील कलाकार टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हते आणि दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी तफावत होती. मात्र, अमिताभ यांनी कोणाचेच ऐकले नाही, त्यांना जे योग्य वाटले तेच त्यांनी केले. त्यांचा निर्णय योग्य ठरला. बिग बी यांचं आयुष्य या शो नंतर पूर्णपणे बदलले.  

टॅग्स :अमिताभ बच्चनयश चोप्रा