Join us

कंपनी 'बुडली' तर तुमच्या पैशांचं काय होतं? शेअर बाजारात पैसे लावण्यापूर्वी हे नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:54 IST

Share Market Risk : कोरोना काळानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, एखादी कंपनी बुडल्यास आपल्या पैशांचं काय होतं माहिती आहे का?

Share Market Risk : शेअर बाजारातगुंतवणूक करताना अनेकजण चांगल्या परताव्याच्या आशेने पैसे लावतात, पण जर एखादी कंपनी बुडाली किंवा दिवाळखोर घोषित झाली तर आपल्या गुंतवलेल्या पैशाचं काय होतं, हा प्रश्न अनेकांना पडतो. बँकेत ठेवलेल्या पैशांना जसं विमा संरक्षण असते. तशी काही योजना शेअर धारकांसाठी असते का? शेअर बाजाराला सर्वाधिक जोखीम असलेले क्षेत्र का म्हणतात? आज तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

कंपनी बुडाल्यास कोण आधी पैसे घेतो?भारतात कंपन्यांच्या दिवाळखोरीसाठी 'दिवाळखोर आणि दिवाळखोरी संहिता' (Insolvency and Bankruptcy Code - IBC) हा कायदा आहे. या कायद्यानुसार, जेव्हा एखादी कंपनी बुडते, तेव्हा तिची मालमत्ता विकून मिळालेले पैसे परत करण्यासाठी एक विशिष्ट क्रम ठरलेला असतो.

  • सुरक्षित कर्जदार (Secured Creditors): यात सर्वात आधी येतात बँका आणि ज्या वित्तीय संस्थांनी कंपनीला कर्ज देताना काहीतरी गहाण ठेवून घेतलेलं असतं (उदा. कंपनीची इमारत, जमीन). त्यांना सर्वात आधी पैसे मिळतात.
  • कर्मचारी आणि कामगार: त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे थकीत पगार आणि इतर देयके दिली जातात.
  • असुरक्षित कर्जदार (Unsecured Creditors): ज्या कर्जदारांनी कंपनीला कर्ज देताना कोणतीही हमी किंवा मालमत्ता गहाण घेतली नव्हती, त्यांना यानंतर पैसे मिळतात.
  • सरकारची देयके: सरकारचे कर (Taxes) आणि इतर काही थकबाकी या टप्प्यावर येतात.
  • शेअरधारक (Shareholders) : सर्वात शेवटी नंबर लागतो तो शेअरधारकांचा! कंपनीची सर्व मालमत्ता विकून आणि वरील सर्वांना पैसे दिल्यानंतर काही पैसे शिल्लक राहिले, तरच शेअरधारकांना त्यांच्या गुंतवणुकीचा थोडासा भाग परत मिळण्याची शक्यता असते. पण, अनेकदा कंपनी पूर्णपणे बुडाल्यास, शेअरधारकांना त्यांच्या पैशावर पाणी सोडावे लागते. कारण त्यांच्यासाठी काहीही शिल्लक राहत नाही. म्हणूनच शेअरमधील गुंतवणूक ही सर्वात जास्त जोखमीची मानली जाते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचं काय?

  • जर तुम्ही थेट शेअर्समध्ये गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाद्वारे पैसे गुंतवले असतील आणि तुमच्या फंडाने ज्या कंपनीत पैसे लावले आहेत, ती कंपनी दिवाळखोर झाली, तर याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होऊ शकतो.
  • त्या कंपनीच्या शेअरची किंमत खूप खाली येते किंवा ती शून्य होते.
  • यामुळे तुमच्या म्युच्युअल फंडाच्या 'नेट ॲसेट व्हॅल्यू' (NAV) म्हणजेच मूल्यावर परिणाम होतो आणि ती कमी होते.
  • मात्र, म्युच्युअल फंड एकाच कंपनीत पैसे गुंतवत नाहीत, तर ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे विभागून गुंतवतात. त्यामुळे एका कंपनीच्या दिवाळखोरीचा संपूर्ण फंडावर फार मोठा परिणाम होत नाही, पण थोडासा फटका बसू शकतो.

वाचा - शेअर बाजाराचा धोका नकोय? SIP मधून करोडपती बनण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

थोडक्यात, शेअर बाजारात गुंतवणूक करताना कंपनी बुडाल्यास शेअरधारकांचे पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीत पैसे लावण्यापूर्वी तिची आर्थिक स्थिती आणि धोके यांचा सखोल अभ्यास करणे नेहमीच शहाणपणाचे ठरते.

टॅग्स :शेअर बाजारसेबीशेअर बाजारगुंतवणूक