Tata Group : दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि लोकांचा विश्वास यांच्या बळावर टाटा समूहाने पुन्हा एकदा भारतातील ब्रँडिंग जगतात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ब्रँड व्हॅल्युएशन कन्सल्टन्सी ब्रँड फायनान्सच्या 'इंडिया १०० रिपोर्ट २०२५' नुसार, टाटा ग्रुप भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. या वर्षी टाटा ग्रुपच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये तब्बल १०% वाढ झाली आहे. यामुळे त्यांचे ब्रँड मूल्य ३० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारे ते देशातील पहिले ब्रँड बनले आहेत, जो एक ऐतिहासिक विक्रम आहे.
रतन टाटा यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नैतिक नेतृत्वामुळेच टाटा समूहाला एक व्यावसायिक संस्था म्हणून नव्हे, तर एक विश्वासार्ह आणि नैतिक ब्रँड म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांनी टाटा समूहाला जागतिक पातळीवर नेण्यात मोलाची भूमिका बजावली. रतन टाटा यांच्यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांनी समुहाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. काही महिन्यात त्यांनी टाटा समुहाला आणखी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात यश मिळवले.
या यादीत इतर कंपन्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. इन्फोसिस १५% वाढीसह १६.३ अब्ज डॉलरच्या मूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. एचडीएफसी ग्रुप ३७% वाढीसह १४.२ अब्ज डॉलरच्या मूल्यासह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर एलआयसी ३५% वाढीसह १३.६ अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानावर आहे. या अहवालातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अदानी ग्रुप. ब्रँड व्हॅल्यूमध्ये ८२% वाढ नोंदवून, अदानी ग्रुप या वर्षी भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड बनला आहे.
या अहवालात असे म्हटले आहे की, देशाची मजबूत आर्थिक स्थिती आणि ६-७% GDP वाढीचा दर यामुळे भारतीय कंपन्यांना त्यांचे ब्रँड मूल्य वाढवण्याची मोठी संधी मिळाली आहे. वाढती देशांतर्गत मागणी आणि सार्वजनिक-खाजगी गुंतवणुकीमुळे कंपन्या वेगाने प्रगती करत आहेत.
या अहवालानुसार, भारतातील टॉप १०० ब्रँड्सचे एकूण ब्रँड व्हॅल्यू २३६.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे, जे देशाची आर्थिक प्रगती आणि कॉर्पोरेट क्षेत्राची ताकद स्पष्टपणे दर्शवते.