Iran-Israel Conflict : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आज शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. दिवसभर बाजारात मंदीचे वातावरण राहिले. काल (गुरुवार) शेअर बाजारात ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. त्यानंतर सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीही बाजार लाल रंगात बंद झाल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजाराची आजची स्थितीमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज ०.७० टक्के (५७३ अंकांनी) घसरून ८१,११८ वर बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० प्रमुख समभागांपैकी केवळ ४ समभाग वाढीसह बंद झाले, तर २६ समभागांना तोटा झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकनिफ्टी आज ०.६८ टक्के (१६९ अंकांनी) घसरून २४,७१८ वर बंद झाला. एनएसईवर व्यवहार झालेल्या २९६४ समभागांपैकी १०५९ समभाग वाढीसह, १८२४ समभाग घसरणीसह, तर ८१ समभाग कोणताही बदल न होता बंद झाले.
'या' शेअर्सना बसला मोठा फटकाआजच्या बाजारात अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. अदानी पोर्ट्स, आयटीसी, एसबीआय (SBI), इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि टायटन यांना सर्वाधिक तोटा झाला. याशिवाय, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड, बजाज फिनसर्व्ह, झोमॅटो, एचयूएल (HUL), आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी (NTPC), बजाज फायनान्स, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्सही तोट्यात बंद झाले.
फक्त टेक महिंद्रा, टीसीएस (TCS), मारुती सुझुकी आणि सॅम फार्मा यांसारख्या मोजक्याच कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, ज्यामुळे बाजाराला थोडाफार आधार मिळाला.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थितीक्षेत्रीय निर्देशांकांमध्येही सर्वत्र 'लाल' चिन्ह दिसून आले.निफ्टी पीएसयू बँकमध्ये सर्वाधिक १.१८% ची घसरण नोंदवली गेली.याशिवाय, निफ्टी एफएमसीजी (१.०५%), निफ्टी ऑटो (०.३६%), निफ्टी मेटल (०.९६%), निफ्टी फार्मा (०.२३%), निफ्टी प्रायव्हेट बँक (०.९१%), निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स (०.७०%), निफ्टी ऑइल अँड गॅस (०.७३%) आणि निफ्टी मिडस्मॉल आयटी अँड टेलिकॉम (०.४३%) हे सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
बाजारातील घसरणीचे मुख्य कारणआजच्या बाजारातील या घसरणीमागे इराण-इस्रायल संघर्ष हे प्रमुख कारण आहे. या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या किमती वाढल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आणि शेअर विक्री सुरू केली.
वाचा - स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
जागतिक भू-राजकीय परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. गुंतवणूकदार सध्या आखाती प्रदेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.