Tuhin Kanta Pandey : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांता पांडे यांची निवड करण्यात आली आहे. पांडे माधबी पुरी बुच यांची जागा घेतील. माधबी बुच यांचा कार्यकाळ १ मार्च २०२५ रोजी संपत आहे. बुच यांनी सेबी प्रमुख पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. पांडे हे अनुभवी IAS अधिकारी असून त्यांनी वित्त सचिव म्हणून देशाच्या आर्थिक धोरणांना आकार देण्यास हातभार लावला. त्यांचे नेतृत्व भारतीय शेअर बाजाराला नवी दिशा देऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोण आहे तुहिन कांता पांडे?तुहिन कांता पांडे आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे ११ वे अध्यक्ष बनले आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) पांडे यांची सेबीच्या प्रमुखपदी ३ वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. पांडे हे ओडिशा केडरचे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते महसूल विभागाचे वित्त सचिव आणि सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सप्टेंबर २०२४ मध्ये, टीव्ही सोमनाथन कॅबिनेट सचिव झाल्यानंतर पांडे यांनी वित्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला. याआधी, त्यांनी सरकारमध्ये गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) आणि सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE) यासारख्या अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. ही पदे भूषवत असताना त्यांनी भारताची आर्थिक धोरणे, निर्गुंतवणूक कार्यक्रम आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
एअर इंडिया आणि टाटा समूहाशी कसा आला संबंध?तुहिन कांता पांडे यांनी अलिकडच्या वर्षांत काही प्रमुख आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय, १९६१ च्या आयकर कायद्याची जागा घेण्यासाठी तयार केलेल्या नवीन आयकर विधेयकाचा मसुदा तयार करण्यातही त्यांनी योगदान दिले. डीआईपीएएममध्ये सर्वाधिक काळ कार्यरत असलेल्या सचिवांपैकी एक असल्याने, तुहिन कांता पांडे यांनी सरकारी कंपन्यांमधील सरकारी हिस्सेदारीच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाटाटा समूहाला विकण्यात आली, जो सरकारच्या सर्वात मोठ्या निर्गुंतवणूक उपक्रमांपैकी एक आहे. याशिवाय आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रियाही त्यांनी हाताळली, जी अजूनही सुरू आहे.