नवी दिल्ली - आर्थिक मंदीचे सावट, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी यामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्थेतीत सरकारच्या अडचणीत वाढ होत असून, देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार लकवरच काही मोठे आणि धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. करांमध्ये सवलत, तसेच नोकऱ्या टिकवण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय अशा घोषणांची सुरुवात आजपासून होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या उद्योगांना पॅकेज देण्याबाबतचे संकेत आधीच मिळाले होते. मात्र सरकार केवळ आर्थिक पॅकेजवर थांबण्याची शक्यत नाही. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीयअर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गात कुठलेही अडथळे येऊ नयेत, अशा उद्देशाने हे मोठे निर्णय़ घेतले जाणार आहे. उद्योग जगतात निर्माण झालेले चिंतेचे मळभ दूर करून ढासळता आर्थिक डोलारा सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: याबाबत हस्तक्षेप करणार असून, देशी आणि विदेशी गुंतवणुकदारांमध्ये विश्वास जागवण्यासाठी त्यांच्याशी मोदी थेट संवाद साधू शकतात. दरम्यान, उद्योगांना पॅकेजची घोषणा करण्यात आल्यानंतर तत्काळ इतरही काही मोठे निर्णय घेतले जातील. यामध्ये सरकारी खर्चात कपातीसारखा मोठा निर्णयही समाविष्ट असू शकतो.
नोकऱ्या टिकणार, टॅक्स वाचणार; 'अच्छे दिन'साठी धक्कादायक निर्णय घेणार मोदी सरकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 10:40 IST