Rice Exports Stuck : काही दिवसांपूर्वी अमेरिकन बंदरात भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे नष्ट केल्याची बातमी ताजी असतानाच, आता आणखी एका मोठ्या निर्यातीला मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. यावेळी सुमारे एक लाख टन बासमती तांदूळ भारतीय बंदरांवर अडकून पडला आहे. हा तांदूळ खरं तर इराणला पाठवला जाणार होता, पण इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे हा माल आता बंदरातच थांबला आहे. या घटनेमुळे भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे.
बंदरात अडकला बासमती तांदळाचा मोठा साठाऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा या महत्त्वाच्या बंदरांवर सुमारे १ लाख टन बासमती तांदूळ भरला आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धासारख्या परिस्थितीमुळे जहाजांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. तसेच, सागरी विमा कंपन्यांकडून 'युद्ध संरक्षण' (War Risk Insurance) उपलब्ध नसल्यामुळे हा तांदूळ तिथेच अडकून पडला आहे. आंतरराष्ट्रीय वाद आणि युद्ध यासारख्या परिस्थितींचा समावेश सामान्यतः सागरी विमा पॉलिसींमध्ये केला जात नाही, त्यामुळे निर्यातदारांना मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
हरियाणाला सर्वाधिक फटकाभारताच्या एकूण बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी सुमारे १८ ते २० टक्के तांदूळ एकट्या इराणकडून खरेदी केला जातो. यातील जवळजवळ एक तृतीयांश तांदळाची निर्यात एकट्या हरियाणामधून होते. त्यामुळे तांदळाची निर्यात थांबल्याने हरियाणाला सर्वाधिक फटका बसला आहे. कर्नाल, कैथल आणि सोनीपत येथील निर्यातदारांचे म्हणणे आहे की, तांदळाच्या मालाची वाहतूक मंदावली आहे, माल पाठवण्यास विलंब होत आहे आणि त्यांची देयकेही अडकली आहेत.
हरियाणा तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष सुशील जैन यांनी सांगितले की, दरवर्षी भारतातून इराणला सुमारे १० लाख मेट्रिक टन बांदामती तांदूळ पाठवला जातो, त्यापैकी ३० ते ३५ टक्के तांदूळ हरियाणामधून जातो. विशेष म्हणजे, सुमारे २ लाख मेट्रिक टन तांदळाचे पेमेंट, ज्याची किंमत १,५०० कोटी ते २००० कोटी रुपये आहे, ते देखील अडकले आहे.
आंतरराष्ट्रीय संकटामुळे देशांतर्गत बाजारात दर घटलेनिर्यात घट झाल्याचा परिणाम आता देशांतर्गत बाजारपेठेतही दिसून येत आहे. हरियाणा तांदूळ निर्यातदार संघटनेच्या मते, बासमती तांदळाच्या किमती प्रति किलो ४ ते ५ ने कमी झाल्या आहेत. जर हे संकट असेच लांबले, तर त्याचा भारतीय निर्यातदारांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाचा - पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
सौदी अरेबियानंतर इराण ही भारतासाठी बासमती तांदळाची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने इराणला सुमारे १० लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला होता. त्याच आर्थिक वर्षात, भारताने एकूण सुमारे ६० लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला. भारत प्रामुख्याने मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील देश - इराक, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि युनायटेड स्टेट्समध्ये तांदूळ निर्यात करतो. या परिस्थितीमुळे भारताच्या कृषी निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.