Join us

Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:22 IST

Iran-Israel War Impact on India : गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायमध्ये संघर्ष सुरू आहे. या दोन्ही देशांसोबतच आता जगभरातील अनेक देशांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Iran Israel War Tension: इराणमधील चाबहार बंदराबाबत भारत गंभीर आहे. मे २०२४ मध्ये भारतानं या बंदरातील शहीद बेहेश्ती टर्मिनल १० वर्षांसाठी चालवण्याचा करार केला होता. हे बंदर भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंतचा थेट मार्ग देते. यामुळे पाकिस्तान बाजूला पडू शकतो. तसंच चीनच्या ग्वादर बंदराचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. मात्र, इस्रायल-इराण आणि चाबहार बंदर, आयएनएसटीसी कॉरिडॉरवर पाश्चिमात्य निर्बंधांमुळे चाबहार बंदर आणि आयएनएसटीसी कॉरिडॉरवर परिणाम होऊ शकतो. कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून भारत आणि इराणचे अधिकारी चाबहार बंदराबाबत सातत्यानं चर्चा करत असतात.

चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारत पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (आयपीजीएल) हे बंदर चालवत आहे. हे बंदर भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी रस्त्यानं जोडतं. यामुळे पाकिस्तानच्या मार्गाची गरज पडणार नाही. सोबतच चीनच्या ग्वादर बंदराचा प्रभावही कमी होतो.

स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

१० वर्षांचा केलाय करार

मे २०२४ मध्ये भारताने शाहिद बेहेश्ती टर्मिनल १० वर्षांसाठी चालवण्याचा करार केला होता. हा करार भारताच्या दीर्घकालीन बांधिलकीचं द्योतक आहे. आयपीजीएल हा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि कांडला पोर्ट ट्रस्टचा संयुक्त उपक्रम आहे. हे इराणच्या बनादर भागाशी मिळून काम करतं.

या बंदराच्या विकासासाठी भारतानं ८५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यामुळे बर्थ अपग्रेड केलं जाईल. याव्यतिरिक्त, एक्झिम बँकेनं १५ कोटी डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. चाबहार-जाहेदान रेल्वेसाठी स्टीलची आयात सुलभ करण्यासाठी ४० कोटी डॉलर्सचं आणखी एक कर्ज देण्यात आलंय. लाइन ऑफ क्रेडिटची रक्कम मिळाल्यानंतर ती ५५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ४७७० कोटी रुपये होते.

चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्प यापूर्वी इरकॉन इंटरनॅशनलला देण्यात आला होता. यासाठी १.६ अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला. परंतु, निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे, २०२० मध्ये इराणनं त्यातून माघार घेतली.

टॅग्स :इराणइस्रायलगुंतवणूकभारत