Join us

भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 06:55 IST

कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताकडून महिन्याला सरासरी १ लाख कोटी रुपये खर्च; जागतिक पातळीवर अस्थिरता वाढल्याने भारताने डिसेंबर महिन्यापासूनच वाढविली आयात; इराणकडून आयात शून्य, रशियाकडून मात्र झाली मोठी वाढ

मुंबई : जागतिक पातळीवर युद्धाची भीती वाढल्याने भारताने कच्च्या तेलाची आयात गत डिसेंबर महिन्यापासूनच वाढवली आहे. भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल ११,५९,९९२ कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात केले असून, गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात १ लाख ८८ हजार ३२ कोटी रुपयांची आयात केली आहे. 

भारत प्रत्येक महिन्यात सरासरी १ लाख कोटी रुपये कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च करत असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

इराणच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली तर त्याचा भारतावर लगेच परिणाम होण्याची फार कमी आहे. 

भारत सर्वाधिक तेल खरेदी मित्र देश असलेल्या रशियाकडून करतो आणि ही आयात होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होत नाही.

भारतातील तांदूळ निर्यातदार संकटात

संघर्षामुळे बासमती तांदूळ निर्यातदार संकटात आहेत. तांदूळ निर्यातदार महासंघाचे प्रमुख सुशील जैन म्हणाले की, यंदा १० लाख टन बासमती तांदूळ भारतातून इराणाला निर्यात झाला.

३० ते ३५ टक्के तांदूळ हरियाणातून गेला आहे. या तांदळाचे पैसे मिळण्यास युद्धामुळे उशीर होत आहे. याशिवाय १ लाख टन तांदूळ बंदरांवर अडकून पडला आहे.

सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कुठे?

इराणमध्ये पेट्रोल, डिझेल सर्वाधिक स्वस्त आहे. येथे पेट्रोल भारतीय चलनानुसार ६ रुपये लिटर आहे. पाण्याची बाटली १० रुपयांना आहे.

टॅग्स :खनिज तेलभारतइराणइस्रायलरशिया