Join us  

"देशाच्या अर्थव्यस्थेसाठी १९९१ पेक्षाही कठीण वेळ येतेय; खुश होण्याची नाही, तर विचार करण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 8:00 AM

Former PM Manmohan Singh On Economy : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा इशारा. देश म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचं मनमोहन सिंग यांचं मत.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा इशारा. देश म्हणून आपला प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असल्याचं मनमोहन सिंग यांचं मत.

देशात आर्थिक उदारीकरणाचा पाया रचणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सतर्क केलं आहे. "अर्थव्यवस्थेची जी स्थिती १९९१ मध्ये होती, तशीच काहीशी स्थिती येणाऱ्या काळात होणार आहे. सरकारनं यासाठी तयार राहिलं पाहिजे," असं मनमोहन सिंग म्हणाले. 

२००४ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. तसंच १९९१ मध्ये तत्कालिन पंतप्रधान नरसिंम्हा राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होती. २४ जुलै १९९१ रोजी त्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यस्थेचा उदारीकरणाचा पाया मानला जातो. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला २४ जुलै रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. याच्या पूर्वसंध्येला मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलं. 

"सध्याची वेळ ही खुश होण्याची किंवा कोणत्या गोष्टीत मग्न होण्याची नाही. ही वेळ आत्मपरीक्षण आणि विचार करण्याची आहे. अर्थव्यवस्थेचा पुढील मार्ग १९९१ च्या संकटाच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक आहे. एक देश म्हणून आपला प्राधान्यक्रम पुन्हा ठरवण्याची गरज आहे," असंही ते म्हणाले. 

सुधारणा महत्त्वाच्या"३० वर्षांपूर्वी काँग्रेसनं भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणांची सुरूवात केली होती. पक्षानं देशाच्या आर्थिक धोरणांसाठी एक नवा मार्ग तयार केला होता. गेल्या तीन दशकांत आलेल्या सरकारांनी त्याचा अवलंब केला आणि आज आपली गणना जगाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत केली जाते," असं डॉ. सिंग म्हणाले. माझ्या सहकाऱ्यांसोबत मिळून या सुधारणा करण्यासाठी संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. गेल्या तीन दशकांत आपल्या देशानं उत्तम आर्थिक प्रगती केली आहे, हे पाहून अभिमान वाटतो. या कालावधीत ३० कोटी भारतीय नागरिक गरीबीतून बाहेर आणि कोट्यवधी नोकऱ्याही निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

कोरोनामुळे रोजगार गेलायादरम्यान मनमोहन सिंग यांनी कोरोनावरही भाष्य केलं. "कोरोनाच्या महासाथीमुळे झालेलं नुकसान आणि या पार्श्वभूमीर गेलेल्या कोट्यवधी नोकऱ्यांचं दु:ख वाटत आहे. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्र मागे राहिले. ते आपल्या आर्थिक प्रगतीच्या गतीप्रमाणे सोबत आले नाही. या कालावधीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि अनेकांचे रोजगारही गेले. असे व्हायला नको होतं," असंही त्यांनी नमूद केलं. 

नंतरच आराम करायचाय"१९९१ मध्ये मी एक मंत्री म्हणून फ्रान्सचे कवी व्हिक्टर ह्युगो यांच्या एका कवितेचा उल्लेख केला होता की पृथ्वीवर कोणतीही शक्ती तो विचार थांबवू शकत नाही, ज्याची वेळ आता आली आहे. ३० वर्षानंतर आपल्याला एक देश म्हणून अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट याची कविता लक्षात ठेवायला हवी की आपल्याला आपली आश्वासनं पूर्ण केल्यानंतर आणि मैलाचा दगड गाठल्यानंतरच आराम करायचा आहे," असं मनमोहन सिंग म्हणाले. 

टॅग्स :अर्थव्यवस्थापंतप्रधानमनमोहन सिंगकाँग्रेसभारतकोरोना वायरस बातम्या