Vidarbha weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत समाधानकारक ते मुसळधार पावसाची नोंद झाली असली तरी बुलढाणा जिल्हा मात्र, पावसाबाबत सर्वात मागे राहिला आहे. (Vidarbha Weather Update)
आतापर्यंत बुलढाण्यात केवळ ५६४.९ मि.मी. पाऊस नोंदला गेला असून खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांत वाढली आहे. गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांत अनुक्रमे १३२५.८ मिमी व १०१३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, या भागात सरासरीपेक्षा दुपटीने अधिक पाऊस झाला आहे. (Vidarbha Weather Update)
नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची स्थिती चांगली असून खरीप हंगामाला मोठा हातभार लागला आहे.(Vidarbha Weather Update)
खरीप पिकांचे भवितव्य
बुलढाण्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खरीप पिकांची स्थिती गंभीर होत चालली आहे. जून महिन्यात मान्सूनने दांडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली. काही भागांत पेरणी झाली असली तरी पाऊस न झाल्याने पिके वाळून जाण्याची वेळ आली. जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस झाला असला तरी तो अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचला नाही.
धरणांचा पाणी साठा वाढला, पण
जून अखेरीस मान्सून सक्रिय झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यांत विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे ओढे-नद्या वाहू लागल्या, धरणे भरली आणि अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. मात्र बुलढाणा जिल्ह्यात पावसाची नोंद कमी असल्याने पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंता
कमी पावसामुळे खरीप हंगाम कोलमडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. एकीकडे गडचिरोली-चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हंगाम बळकट केला असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात मात्र पावसाचा तुटवडा शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरत आहे.
जिल्हानिहाय पावसाची नोंद (मिमी)
गडचिरोली : १३२५.८
चंद्रपूर : १०१३.६
गोंदिया : ९८६.९
भंडारा : ९४४.२
नागपूर : ८२७.३
वर्धा : ७८३.६
यवतमाळ : ७९५.६
अमरावती : ६०९.६
वाशिम : ८३१.९
अकोला : ५८४.९
बुलढाणा : ५६४.९