Join us

Weather Report : महाराष्ट्रातील 'या' दहा जिल्ह्यात 29 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 6:03 PM

संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता 29 एप्रिलपर्यंत कायम आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता 29 एप्रिलपर्यंत कायम आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही. महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती क्षेत्रातील तालुक्यात हे वातावरण अजुन 2  दिवस म्हणजे 1 मे पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.                          मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गुजरात राज्यात मात्र दि.27 ते 30 एप्रिलच्या चार दिवसात (शनिवार ते मंगळवार) दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यताही जाणवते, तर तेथील किनार पट्टीवरील क्षेत्रात तर दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येऊ शकतो. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 10 जिल्ह्यात मात्र पहाटेच्या किमान तापमान हे सरासरीपेक्षा 5 डिग्री से. ग्रेडने  झालेल्या वाढीमुळे या 4 (27 ते 30 एप्रिल) दिवसात रात्रीच्या उकाड्यातही वाढ होण्याची शक्यता जाणवते.      

मंगळवार 30 एप्रिलपासून मात्र वातावरण स्वच्छ होवु शकते. आणि, त्यानंतर दुपारच्या कमाल तापमानातही सध्यापेक्षा हळूहळू 2 ते 3 डिग्रीने वाढ होवु शकते. सध्या जरी हे वातावरण निवळत असले तरी पूर्व-मोसमी हंगाम अजुनही 40 ते 50 दिवस बाकी आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट व चक्रीवादळ निर्मिती अशा सारख्या हंगामी वातावरणीय घटनांची शक्यता ही असतेच. तसे काही असल्यास, त्या त्या वेळी सूचित केले जाईल.

उष्णता आणि अवकाळीचे कारण 

दरम्यान वरील १ ते ३ मधील सध्याच्या उष्णता व अवकाळी वातावरणास खालील वातावरणीय प्रणाल्या पूरक जाणवतात. (i) अवकाळीसाठी - समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीवर हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस व त्यातून तयार होणारी वारा खंडितता प्रणाली महाराष्ट्रावर सुस्पष्ट असुन मराठवाड्यावरही एक चक्रीय वाऱ्याची स्थितीही आहे. (ii) उष्णतेसाठी इराण, अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तानातून गुजराथ मार्गे  महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उष्ण वाऱ्याचे वहन होत आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे? 

संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण चार दिवसानंतर म्हणजे मंगळवार दि.30  एप्रिलपासून निवळण्याची शक्यता जाणवते. सध्या सोमवार दि. 29 एप्रिल पर्यंत सकाळी वातावरण जरी स्वच्छ वाटत असले तरी दुपारनंतर अवकाळीचे वातावरण तयार होते. ते मध्यरात्री पर्यंतही टिकून राहण्याची शक्यता असते. त्यातच रब्बीतील पिकांपैकी सध्या मागास कांदे साठवणी तर भरड धान्ये मशीनिंग, रास भरणी, वाळवणी इ. स्थितीत खळ्यावर आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सोमवार दि.29 एप्रिल पर्यंत गाफील न राहता सावधानता बाळगुन खळ्यावरील कामाचे नियोजन करणे गरजेचे समजावे, असे वाटते.                               लेखक :

माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ, पुणे              

टॅग्स :हवामानशेतीनाशिकतापमानपाऊस