Manjara River Water Release : कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मांजरा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.(Manjara River Water Release)
धनेगाव प्रकल्पातून मांजरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे नदीवरील आठ उच्चस्तरीय बॅरेजेस भरून निघणार आहेत.(Manjara River Water Release)
या निर्णयामुळे सुमारे ११ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणार असून विशेषतः उसाच्या पिकाला मोठे 'जीवनदान' मिळणार आहे.
आठ दिवसांत पाणी सोडण्याची तयारी
शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आणि पाणीपट्टी भरण्याच्या तयारीनंतर जलसंपदा विभागाने धनेगाव ते साई-नागझरी दरम्यानच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या पाण्यामुळे पिकांना किमान दोन वेळा सिंचन मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'या' आठ बॅरेजेसमध्ये पाणी साठणार
मांजरा नदीवरील लासरा, अंजनपूर-बोरगाव, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, नागझरी आणि साई या बॅरेजेसमध्ये उन्हाळ्याच्या काळात पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे धनेगावपासून साई-नागझरीपर्यंत नदीपात्रात पाण्याचा प्रवाह दिसणार असून सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे.
कालव्यांतूनही पाणीपुरवठा
नदीपात्रासोबतच मांजरा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्हाळी हंगामातील पहिले रोटेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून एप्रिल आणि मे महिन्यांत आणखी दोन रोटेशन सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एकूण १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे.
५ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ
या आठही बॅरेजेसच्या लाभक्षेत्रात सुमारे ४ ते ५ हजार शेतकरी येतात. या भागातील मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक उभे असून उन्हाळ्यातील तीव्रतेमुळे पाण्याची मोठी गरज निर्माण झाली होती.
वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांचे नुकसान टळणार असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाणीपट्टीतून ५० लाखांचा महसूल
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शवली असून यामधून सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल जमा होणार आहे. पाणीपट्टी भरल्यानंतर तातडीने बॅरेजेसमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल.
भूजलपातळीतही होणार वाढ
नदीपात्रात पाणी वाहू लागल्याने परिसरातील भूजलपातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीवर सकारात्मक परिणाम होऊन पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सोय अधिक सक्षम होणार आहे.
जलसंपदा विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे यंदाचा उन्हाळा मांजरा काठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असून शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे.
Web Summary : Water released from Dhanegaon project into Manjara River will fill eight barrages, irrigating 11,000 hectares. This provides crucial relief, especially for sugarcane, benefiting 5,000 farmers. Water tax revenue is expected to reach ₹50 lakh, improving groundwater levels.
Web Summary : मंजरा नदी में धनेगांव परियोजना से पानी छोड़ा गया, जिससे आठ बैराज भर जाएंगे और 11,000 हेक्टेयर भूमि की सिंचाई होगी। इससे गन्ना किसानों को बड़ी राहत मिलेगी, लगभग 5,000 किसानों को लाभ होगा। जल कर राजस्व ₹50 लाख तक पहुंचने की उम्मीद है, जिससे भूजल स्तर में सुधार होगा।