Maharashtra Rain Alert : मुंबई सह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, शनिवार दि. ३१ मे पर्यन्त मान्सूनपूर्व (मान्सूनचा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व अवकाळी पावसाची (Avkali Paus) शक्यता ही कायम आहे. बुधवार दि. २१ मे ते शनिवार दि. ३१ मे पर्यंतच्या दहा दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची (Rain) शक्यता जाणवते.
उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात आज पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. २५ मेपर्यंत जोरदार तर विदर्भातील ११ जिल्ह्यात या दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड अशा सतरा जिल्ह्यात या आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते. या आठवड्यातील पावसाचा जोर कशामुळे? एकाच वेळी, अरबी समुद्र, बं. उपसागर, व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर अश्या तीन समुद्रात १७ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान, तिन्हीही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि ह्या तीन्हही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता ह्या आठवड्यात निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात गुजरात व महाराष्ट्र कि. पट्टी समोर तर बं. उपसागरात प. बंगाल व ओरिसा कि. पट्टी समोर तर प्रशांत महासागरात चीनच्या गूएन्गडॉन्ग राज्याच्या माकू शहराजवळील कि. पट्टी समोर ह्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती तयार होणार आहे. अरबी समुद्रातील गुजरातकडे तर बं. उपसागारातील ओरिसा, छत्तीसगडकडे चक्रीय वाऱ्यांचे मार्गक्रमण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र व गुजरात, ओरिसा, बंगाल येथे अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे. महाराष्ट्रातील तापमाने व आल्हाददायकपणा : वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असुन, अशाच पद्धतीने राहण्याची शक्यता ही कायम आहे. या व्यतिरिक्त वातावरणात जर एकाकी काही बदल झालाच तर तसे सूचित करता येईल.
शेत मशागती संबंधी-महाराष्ट्रात या पावसामुळे केवळ पेरणपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होवु शकतो. अर्थात हा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच्याच हिमतीवर घ्यावा, असे वाटते. कारण मान्सून अजूनही टप्प्यात नसुन दूर आहे. कारण त्याच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास, महाराष्ट्रात येण्यास अजुन २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आणि त्याच्या आगमनानंतर त्याची स्थिती काय असेल, त्याच वेळेस व्यक्त करता येईल.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD पुणे