Jayakwadi Dam Water Level : राज्यातील पावसाचा जोर आणि वरच्या धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी धरण भरतीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. इसापूर धरणही ७५ टक्क्यांवर भरल्याने पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. (Jayakwadi Dam Water Level)
संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Jayakwadi Dam Water Level)
राज्यातील महत्त्वाच्या जलसाठ्यांपैकी एक असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणातीलपाणीसाठा भरतीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वरच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाण्याच्या आवकामुळे सोमवारी (२८ जुलै) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी ८५.९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. (Jayakwadi Dam Water Level)
धरणात ३१ हजार ८९६ क्युसेकने पाण्याची जोरदार आवक सुरू असून, यामुळे पाणीपातळी १५१९.२५ फूट इतकी झाली आहे. सध्या धरणात एकूण २५९४.८६७ दलघमी तर जिवंत साठा १८५६.७६१ दलघमी इतका असून ही स्थिती पाहता लवकरच धरणातील पाणी ९० टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही स्थिती उद्भवल्यास धरणाचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Jayakwadi Dam Water Level)
सध्या ९ हजार ९०० क्युसेकने उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी पाणी सोडले जात आहे, अशी माहिती धरण अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षी याच दिवशी धरणाचा साठा केवळ ६.२६ टक्के होता.(Jayakwadi Dam Water Level)
पैनगंगा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणाचा साठा ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी १–२ दिवसांत पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ४०–४५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता धरणाची पाणीपातळी ४३८.६१० मीटर इतकी नोंदविली गेली असून, धरणातील जिवंत साठा ७२५.६८८ दलघमी इतका आहे. ३१ जुलैपर्यंत मंजूर जलप्रणाली नियोजनानुसार ही पातळी ४४०.१२ मीटर (९१.४३%) वर ठेवावी लागणार आहे.
यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग वाढवण्याची शक्यता असून, त्यासंदर्भात निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. स्थानिक ग्रामस्थांना वेळोवेळी मोबाईल व व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
संभाव्य पुरामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. आपल्याकडील गुरेढोरे, घरगुती, शेती उपयोगी सामान सुरक्षितस्थळी हलवावे तसेच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहून कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये दवंडीद्वारे सूचना द्याव्यात. - एच. एस. धुळगुंडे, उपविभागीय अभियंता