Join us

Agriculture News : कांदा काढणी, रब्बी, गहू, टोमॅटो लागवडीबाबत सामान्य कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:06 IST

Agriculture News : आठवडाभर शेतीची नेमकी कोणती कामे करावीत? म्हणजेच हवामान विभागाकडून सामान्य सल्ला देण्यात आला आहे. 

Agriculture News : गुलाबी थंडीला सुरवात झाली असून रब्बी हंगामातील (Rabbi Season) शेतीकामांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहणार असून थंडी वाढण्याची शक्यता (Weather) हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी वर्तवली आहे. त्याचबरोबर आठवडाभर शेतीची नेमकी कोणती कामे करावीत? म्हणजेच हवामान विभागाकडून सामान्य सल्ला देण्यात आला आहे. 

पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस निरभ्र राहील. तसेच कमाल तापमान ३१-३२ डिग्री से. व किमान तापमान १३-१५ डिग्री से. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ३-५ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढीलप्रमाणे सामान्य कृषी सल्ला काय आहे? ते पाहुयात.... 

सामान्य कृषी सल्ला

  • खरीप कांदा लागवडीचे पाणी तोडावे.
  • रांगडा कांदा लागवडीस नत्र खताचा पहिला हफ्ता द्यावा.
  • वाटाणा पिकाचे लागवडीचे काम पूर्ण करावे. लसून पिकाचे लागवडीचे काम पूर्ण करावे
  • रब्बी कांदा रोपवाटिकेची काळजी घ्यावी.
  • फ्लॉवर, कोबी व टमाटे रोपांची काळजी घ्यावी.
  • रब्बी हंगामातील टमाटे पिकाची लागवड शेवटच्या आठवड्यात करावी..
  • खरीप कांदा पिकाची काढणी करावी, कांदा काढणी करून ३ ते ५ दिवस शेतात सुकवावा. 
  • २.५ ते ३.० सें.मी. पात ठेवून कांदा कापणी करावी
  • पश्चिम घाट विभागात अधिक आर्थिक फायदा मिळविण्यासाठी उपलब्ध ओलाव्यावर उतेरा पीक पद्धतीत भात पिकानंतर जवस पिकाची ७५ टक्के शिफारशीत खत मात्रा (१९:३८.०० किलो नत्र स्फुरदः पालाश प्रती हेक्टर) देऊन लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. 
  • भात कापणीनंतर उतेरा पीक पद्धतीनुसार किंवा उर्वरित ओलाव्यावर वाटाणा, जवस, मसूर, हरभरा, चवळी इत्यादी पिके घेण्यात यावीत. 
  • संरक्षित पाणी / कमी पाणी उपलब्ध असल्यास पेरणी १० नोव्हेंबर पर्यंत करावी. 
  • संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  • गव्हाची बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. 
  • वेळेवर पेरणीसाठी फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, फुले सात्विक, एम.ए.सी.एस ६२२२, एम.ए.सी.एस ६४७८, डी.बी.डब्लू.१६८ या सुधारित वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी प्रती हेक्टर १०० किलो बियाण्यांचा वापर करावा.
  • बागायती हरभरा पिकाची पेरणी १० नोव्हेंबर पर्यंत केल्यास चांगले उत्पादन येते.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा, विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकहवामान