Join us

Dam Storage : नंदुरबार जिल्ह्यातील धरणांत 46 टक्के पाणीसाठा शिल्लक, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 3:20 PM

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये एप्रिल मध्यातच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये एप्रिल मध्यातच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पाणी योजनांमधून पाणी कपात सुरू असल्याने पाण्याासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट मोठे असून शेती आणि गुरांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा ६८२.५ मिमी पाऊस झाला असून त्याची टक्केवारी ७९.३ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाच मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठाही ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. यामुळे प्रकल्पांवर आधारित असलेला शहरी भागातील पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. मे महिन्यात या पाण्याचा उपसा आणि बाष्पीभवन यामुळे पाणी पातळी घटत आहे. प्रामुख्याने शेतीसाठी राखीव असलेले पाणी पाटचारीतून सोडण्याची मागणी शेतकरी करतात, परंतु यंदा पाणी कमी असल्याने खरीपपूर्व शेतीला पाणी उपलब्ध होणे शक्य नसल्याचे चित्र आहे.

 लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट

मध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीर असताना लघु प्रकल्पातही ठणठणाट आहे. सद्यःस्थिती नवापूर तालुक्यातील मैदीपाडा प्रकल्पात २२ टक्के, देवळीपाहा ४५ टक्के, ढोंग ९ टक्के, नेसू २७ तर भुरीवेल लघु प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा आहे. नंदुरबार तालुक्यातील रकानाला प्रकल्पात दिलासादायक चित्र असून याठिकाणी १८ टक्के जलसाठा आहे. याउलट अमरावती नाला, चौपाळे आणि घोटाणे बंधारा पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत. शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्प १०० टक्के कोरडा असून, चिरडा प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा आहे. तळोदा तालुक्यातील धनपूर धरण यंदा प्रथमच कोरडे असून याठिकाणी केवळ ११ टक्के पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्प कोरडे

नंदुरबार जिल्ह्यात पाच मध्यम प्रकल्प आहेत. यातील नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिवण प्रकल्पात आजअखेरीस ५.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. केवळ २८ टक्के पाणीसाठा या प्रकल्पात आहे. या प्रकल्पातून नंदुरबार शहरातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रकल्पात ३० टक्के कमी पाणीसाठा आहे. यामुळे मे महिन्यात पाणी कपात करण्याचे संकट नगरपालिका प्रशासनावर येणार आहे. यामुळे नंदुरबार शहर आणि परिसरासाठी पर्यायी व्यवस्थेची शक्यता आहे. शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पात सध्या ९४ टक्के, नवापूर तालुक्यातील नागन प्रकल्पात ७८ टक्के, कोरडी ४७ तर अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पात केवळ ५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्व पाच प्रकल्पांमध्ये ५ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.      

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :हवामानशेतीधरणपाणी टंचाईनंदुरबार