Join us

आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून विसर्ग सुरू; ५५०० हेक्टर शेती उन्हाळ्यात होणार हिरवीगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:47 IST

Rajiv Sagar Dam : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प (राजीव सागर) तुडूंब भरले असून, सद्यस्थितीत प्रकल्पात ९० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून काही दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला. (Bawanthadi Project Madhya Pradesh/Maharashtra).

मोहन भोयर 

आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प (राजीव सागर) तुडूंब भरले असून, सद्यस्थितीत प्रकल्पात ९० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून काही दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला.

ज्यामुळे उन्हाळी पिकाकरिता २४ गावातील ५,५०० हेक्टर शेती हिरवीगार होणार आहे. सध्या या प्रकल्पातून सिंचनाकरिता पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाळ्यात बावनथडी आंतरराज्य प्रकल्प पावसाच्या पाण्याने शंभर टक्के भरला होता. महाराष्ट्र मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे. खरीप हंगामात धान पिकाकरिता काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

उन्हाळी रब्बी हंगामाकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी धानपीक लागवडीकरिता मिळणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी धान नर्सरीची शेतात पेरणीला सुरुवात केली. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेवून विसर्ग सुरु झाल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत.

उन्हाळी हंगामात भंडारा जिल्ह्याच्या तुमसर व मोहाडी तालुक्यातील गावांना रोटेशन पद्धतीने प्रत्यक्षात ५,५०० हेक्टर शेतजमीन सिंचित होणार असल्याने येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील उन्हाळी हंगामात धानपीक लागवडीकरिता पाणी मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, टेलवर पाणी पोहोचत नाही. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

आमदार राजू कारेमोरे यांनी घेतली दखल

शेतकऱ्यांच्या समस्येची दखल आमदार राजू कारेमोरे यांनी घेतली. बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना धरणातून पाणी विसर्ग करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्यावर प्रकल्पाच्च्या उजव्या कालव्यातून १८ जानेवारीपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तातडीने हा विषय विचारात घेण्यात आल्याने रब्बी धानाचे नियोजन शक्य होणार आहे.

...या गावांना मिळणार पाणी

आंबागड, दावेझरी, हरदोली, टाकला, हिंगणा, हसारा, काटेबाम्हनी, खापा, विहिरगाव, मांगली, तामसवाडी, परसवाडा, तुडका, स्टेशन टोली, देव्हाडी, मांढळ, रोहा, बेटाळा, रोहना, तुमसर, नवरगाव, बोरी, उमरवाडा, शिवणी या २४ गावांतील शेतजमीन सिंचित होतील.

बावनथडी प्रकल्पातून यंदाच्या उन्हाळी हंगामात धानपीक लागवडीकरिता साडेपाच हजार हेक्टर शेतजमीन सिंचित करण्यासाठी १८ जानेवारीपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतीला रोटेशन पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. - आर. आर. बडोले, शाखा अभियंता.

हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात 

टॅग्स :जलवाहतूकशेतीविदर्भमध्य प्रदेशपाणीशेती क्षेत्र