Join us

पावसाचा जोर कमी झाल्याने 'या' धरणातून मुठा नदीत करण्यात येणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने करण्यात आला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:04 IST

Water Release Update : पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून करण्यात येणारा विसर्ग शनिवारी (दि. २१) टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. हा विसर्ग सायंकाळी पाच वाजता २ हजार ७६ क्युसेक इतका कायम ठेवण्यात आला होता.

पुणे जिल्ह्याच्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून करण्यात येणारा विसर्ग शनिवारी (दि. २१) टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. हा विसर्ग सायंकाळी पाच वाजता २ हजार ७६ क्युसेक इतका कायम ठेवण्यात आला होता.

तरीदेखील पावसाच्या प्रमाणानुसार व आवकेनुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

सध्या चारही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा सुमारे १० टीएमसी अर्थात ३४ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा साडेतीन टीएमसी होता. विसर्गातून आतापर्यंत सव्वा टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.

खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा आता ९.९१ टीएमसी अर्थात एकूण क्षमतेच्या ३३.९८ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये या साठ्यात पाव टीएमसीहून अधिक पाणी जमा झाले आहे.

दरम्यान, खडकवासला धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे मुठा नदीत आतापर्यंत सव्वा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे, तर चारही धरणांमध्ये २३० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू आहे.

खडकवासला परिसरात अल्प पाऊस

• खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. दिवसभरात टेमघर परिसरात ७ मिलिमीटर, वरसगाव परिसरात ९, तर पानशेत परिसरात १२ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला.

• खडकवासला परिसरात मात्र केवळ एक मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जलसंपदा विभागाने शुक्रवारी ४ हजार ५६५ हजार क्युसेकने विसर्ग मुठा नदीपात्रात सोडला होता.

• पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हा विसर्ग शनिवारी सकाळी ११ वाजता २ हजार ७६ करण्यात आला. पावसाचा जोर कमी-जास्त झाल्यास विसर्गदेखील कमी-जास्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : यंदा जूनमध्येच राज्यातील धरणे ३७ टक्के भरली; वाचा विभागनिहाय किती झालाय जलसाठा

टॅग्स :जलवाहतूकपुणेशेती क्षेत्रखडकवासलापाऊस