Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या माघारीस पोषक वातावरण, राज्यात दोन ते तीन दिवसात...

By मुक्ता सरदेशमुख | Updated: October 3, 2023 18:00 IST

काय आहे पावसाचा अंदाज?

मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर राज्यातून मान्सूनच्या वापसीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातून दोन ते तीन दिवसात मान्सून माघार घेण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, आज  नैऋत्य मोसमी पावसाने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात भागातून निरोप घेतला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता झारखंडच्या आग्नेय भागात असून चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून 7.6 किमी वर आहे. 

पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर ओसरणार असून तुरळक भागात हलक्या ते मध्यम सरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  पुढील दोन ते तीन दिवसात मराठवाड्यातील तापमान दोन ते तीन अंशाने वाढणार असल्याचेही प्रादेशिक हवामान विभागाने नुकतेच सांगितले. दरम्यान, आज महाराष्ट्रात विदर्भातील पाच जिल्ह्यांना हवामानाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. 

यलो अलर्ट कुठे?

भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

टॅग्स :पाऊसहवामानशेतकरी