Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौठ्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; विषमुक्त शेतीतून हळद आणि पपईचे घेतले विक्रमी उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:33 IST

रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे शेती आणि मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, कौठा येथील शेतकरी दर्शन शंकरराव खराटे यांनी एक नवी वाट चोखाळली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात रासायनिक खताचा वापर न करता, पपईमध्ये हळदीचे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे.

बालय्या स्वामी 

रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे शेती आणि मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील कौठा येथील शेतकरी दर्शन शंकरराव खराटे यांनी एक नवी वाट चोखाळली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता, पपईमध्ये हळदीचे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे.

वसमत तालुक्यातील कौठा येथील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांना फाटा देत विषमुक्त शेतीचा प्रयोग करून नेहमी लागणाऱ्या कालावधीपेक्षा कमी वेळेतच पपईमध्ये हळदीचे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न काढले आहे. सध्याच्या काळात भाजीपाले, विविध प्रकारची फळे व सर्वच पिकांवर उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा व औषधींचा भरमसाठ वापर केल्याचे दिसून येत आहे.

याचा परिणाम म्हणजे सदरील भाजीपाला फळे व अन्नधान्य खाणाऱ्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असून, अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. मुळात अन्नपदार्थच रासायनिक खते आणि औषधामुळे विषारी बनत असल्याने अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परंतु बाजारात आजघडीला सगळीकडेच या रासायनिक आणि घातक खते-औषधांवर वाढवलेलीच अन्नधान्य फळे मिळत असल्याने जनतेला ही आता पर्याय नसल्याचे बोलले जाते; परंतु या सर्व बाबी टाळता याव्यात, यासाठी कौठा येथील शेतकरी दर्शन शंकरराव खराटे यांनी आपल्या शेतात दीड एकर क्षेत्रावर पपई लावून त्यामध्ये हळदीचे आंतरपीक घेतले आहे. विशेष म्हणजे, हळद आणि पपई पिकाला सुरुवातीपासूनच त्यांनी कुठलेही रासायनिक खत किंवा औषध वापरले नाही.

असा आहे 'विषमुक्त' पॅटर्न

दर्शन खराटे यांनी ११०० पपईच्या झाडांची लागवड केली असून, २१ बेडवर 'बेड पद्धतीने' हळद लावली आहे. या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बाजारातील महागड्या रासायनिक खतांना पूर्णतः फाटा दिला आहे. शेणखत, मच्छी चुरी, हाडांचा चुरा, निंबोळी पेंड, एरंड पेंड, तंबाखू पावडर आणि विविध जिवाणूंचा वापर केला.

एकरी ३२ क्विंटलचे उत्पादन

• सरासरी हळद पिकासाठी ९ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो; परंतु विषमुक्त शेतीमुळे साडेसात महिन्यातच हे पीक परिपक्च झाल्याचे दर्शन खराटे यांनी सांगितले.

• रासायनिक खतांचा वापर नसल्यामुळे हळदीसाठी त्यांनी घरचेच बेणे वापरून प्रतिएकर १६ ते १७ हजार रुपये खर्च झाला असून, उत्पादन मात्र एकरी ३२ क्विंटलचे होत असल्याचेही सांगितले.

• यासाठी त्यांनी त्यांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मदतीने जैविक खते व अन्नद्रवे असलेले घटक पदार्थ वापरून ज्यात मच्छी चुरी, हाडांचा चुरा, निंबोळी व एरंड पेंड, हळद व तंबाखू पावडर आणि जिवाणू यांचा वापर करून शेती पिकवली

• सध्या हळद काढणी जोरात सुरू असून, पपईसुद्धा चांगली बहरत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's successful experiment: Toxin-free farming yields record turmeric, papaya crop.

Web Summary : Farmer Darshan Kharate in Hingoli district achieved bumper turmeric and papaya yields using toxin-free methods. He avoided chemical fertilizers, opting for organic alternatives like cow dung and neem cake, resulting in a healthy, profitable harvest in a shorter time.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रहिंगोलीशेतकरीशेतीमराठवाडा