सटवाजी वानोळे
वर्धा जिल्ह्याच्या पिपरी येथील प्रतीक झोडे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला बगल देऊन एक एकर शेतीवर तुती लागवड केली. रेशीम उद्योगातून पहिल्या वर्षी पहिल्याच महिन्यात ६४ किलो कोषाचे उत्पादन घेऊन ३० हजार रुपयांचे व दुसऱ्या महिन्यात १०३ किलो कोष उत्पादन घेऊन ५४ हजार असे दोन महिन्यांत एकून ८४ हजार रुपयाचे उत्पन्न मिळविले.
वर्धा तालुक्यातील पिपरी येथील रहिवासी असलेल्या प्रतीक नामदेवराव झोडे या कृषी पदवीधारक पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची येळाकेळी येथे दीड एकर शेती आहे. आजपर्यंत ते आईवडील यांच्या सहकार्याने पारंपरिक शेती म्हणजे पराटी, सोयाबीन थोडाफार भाजीपाला ही पिके घेत होते.
मात्र निसर्गाचा लहरीपणा व बाजारपेठेतील उत्पादित मालाचे भाव व उत्पादनास येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नव्हता. कोणती शेती करावी? या विचारात असतानाच झाडगाव येथील शेतकरी विशाल भागडे हे मागील २० वर्षापासून सातत्याने रेशीम शेती करीत आहेत व भरघोस उत्पन्न कमवीत आहे, असे समजले.
त्यानुसार कुटुंबासोबत त्यांनी विशाल भागडे यांचे कीटकसंगोपन चालू असताना सातत्याने भेट देऊन रेशीम उद्योग समजून घेतला. रेशीम शेती उद्योग व त्यातून हमखास मिळणाऱ्या उत्पन्न, बाजारपेठ याबाबत त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर रेशीम कार्यालयास भेट देऊन वरिष्ठ तांत्रिक सहायक समूहप्रमुख रजनी बनसोड यांच्याकडून रेशीम उद्योग व तुती बेणे उपलब्धतेबाबत अधिकची माहिती जाणून घेतली.
एका एकरमध्ये केली तुती लागवड
प्रतीक झोडे यांनी ऑगस्टमध्ये १ एकर क्षेत्रावर तुती लागवड केली. जुगाड पद्धतीने कच्चे शेड बांधकाम केले. त्यानंतर मार्चमध्ये १०० अंडीपुंजाची बॅच रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे व रजनी बन्सोड यांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली घेतली. त्यात ६४ किलो कोश उत्पादन होऊन ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यानंतर लगेचच १२० अंडीपुंजाची बॅच घेतली व त्यापासून १०३ किलो कोश उत्पादन होऊन ५४ हजार रुपयांचे उत्पादन मिळविले.
कुटुंबामधील आई, वडील व ते स्वतः शेतात काम करतात. २०० अंडीपुंजापर्यंतची बॅच कुटुंबाचे सहकार्याने घेऊ शकतो. काळजीपूर्वक कामे केली तर रेशीम उद्योग हा शाश्वत उद्योग असून नोकरीच्या मागे न लागता हाच उद्योग भी करणार आहे. तरुण शेतकऱ्यांनी फक्त अनुदान मिळते म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहू नये तर या उद्योगातून अल्प कालावधी मध्येच शेतकरी लक्षाधीश होऊ शकतो. - प्रतीक झोडे, शेतकरी.
झोडे यांनी पुढील बॅचसाठी १५० अंडीपुंजाची चाँकी बुक केली आहे व त्यानुसार व्यवस्थापन सुरू आहे. पुढील बॅचचे १ लाखापर्यंत होईल, असा आत्मविश्वास आहे. परिस्थीतीवर मात करून अनुदानाची वाट न पाहता आपला आर्थिक स्तर उंचावत आहे, ही बाब कौतुकास्पद व इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे. - विलास शिंदे, रेशीम विकास अधिकारी, वर्धा.