जिवती : सध्याच्या काळात शेती परवडत नाही, अशी स्थिती असताना वणी खुर्द येथील २३ वर्षीय युवा शेतकरी सुरेश बाबू बाचीफळे यांनी कष्ट व योग्य नियोजनाच्या बळावर शेतीत उल्लेखनीय यश मिळवले. अवघ्या अर्धा एकर क्षेत्रात टोमॅटो पीक घेऊन ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
एम.ए.चे शिक्षण घेत असतानाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुरेशने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकांचा पर्याय स्वीकारत त्यांनी ५ सप्टेंबर रोजी अर्धा एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड केली.
सुरुवातीच्या काळात काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, कुटुंबाचे सहकार्य व चिकाटीच्या जोरावर सुरेशने पिकाचे व्यवस्थापन यशस्वीपणे केले. लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत उत्पादनास सुरुवात झाली. योग्य खताचे व्यवस्थापन, नियोजित पाणीपुरवठा व प्रभावी कीड नियंत्रण यामुळे पिकाची गुणवत्ता उत्तम राखण्यात सुरेशला यश आले.
बाजारात टोमॅटोला सरासरी ३० ते ४० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने - उत्पन्नात वाढ झाली. प्रत्येक तोडणीत १०० कॅरेट उत्पादन मिळत असून, संपूर्ण हंगामात २० ते २५ टन उत्पादन - नोंदविण्यात आले. उत्पादन खर्च वजा - जाता सुमारे ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याने सुरेशचे हे यश विशेष ठरले.
पेरली नवी उमेद
आजच्या काळात उच्चशिक्षित युवक नोकरीकडे अधिक आकर्षित होतात. शेतीत आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास चांगले उत्पन्न मिळवता येते. हे सुरेशने आपल्या कृतीतून सिद्ध केले. या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली. गावातील काही बेरोजगार युवकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर
