धुळे : पारंपरिक पिकांच्या अनिश्चिततेवर मात करत देऊर येथील शेतकरी शिरीष देवरे यांनी शेतीमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. कपाशीला पर्याय म्हणून त्यांनी निवडलेल्या टरबूज पिकाने केवळ ६५ दिवसांत त्यांना मालामाल केले असून, त्यांच्या शेतातील दर्जेदार टरबूज आता थेट गुजरातची राजधानी अहमदाबादच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
देवरे यांनी पाच एकर क्षेत्रावर रब्बी हंगामात टरबूजाची लागवड केली होती. ६ बाय ४ अंतरावर बेड तयार करून, मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करत हे पीक जोपासले. बियाण्यांऐवजी रोप लागवड पद्धतीचा अवलंब केल्याने पिकाची वाढ जोमाने झाली आणि खर्चातही मोठी बचत झाली.
१०० टन टरबुजाची पहिली तोडणी
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने सध्या परराज्यात टरबूजाला मोठी मागणी आहे. देवरे यांच्या बागेतील फळांचे वजन ४ ते ६ किलोपर्यंत भरले असून, पहिल्याच तोडणीत तब्बल १०० टन माल निघाला आहे. व्यापाऱ्यांमार्फत ८ रुपये प्रति किलो या दराने या टरबूजांची खरेदी करण्यात आली आहे. गुजरातसह दिल्ली आणि राजस्थानमध्येही उन्हाळ्यामुळे टरबूजाची मोठी मागणी असल्याने, देवरे यांच्या या प्रयोगाला उत्तम बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
प्रेरणा ठरेल
कापूस आणि मका यांसारख्या पिकांमध्ये अपेक्षित नफा मिळत नसल्याने अनेक शेतकरी हवालदिल होतात. मात्र, शिरीष देवरे यांनी योग्य नियोजन आणि वेळेवर फवारणीच्या जोरावर अवघ्या दोन महिन्यांत ८ लाखांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. खर्च वजा जाता त्यांना ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.
शेतीच्या एकूण क्षेत्रातून ५ एकरवर टरबूज लागवड केली. हे पीक वाटतं तितकं सोपं नसून त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर फवारणी आणि व्यवस्थापन खर्चिक असले तरी, योग्य नियोजनामुळे यंदा शेतीचा खर्च वजा जाता चांगले उत्पन्न हाती आले आहे.
- शिरीष देवरे, प्रगतशील शेतकरी, देऊर (धुळे)
