Join us

Kakadi Farming : अवघ्या एकरभर काकडीत लाख रुपयांचं उत्पन्न, मालेगावच्या शेतकऱ्यांची कमाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:35 IST

Kakadi Farming : याच मार्केट गणित हेरून मालेगावच्या (Malegaon farmer) एका शेतकऱ्याने एकरभर काकडी पिकवली.

Kakadi Farming : सध्या उन्हाळ्याचे दिवस  (Summer Days) असून काकडीसह टरबूज आदी शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. याच मार्केट गणित हेरून मालेगावच्या (Malegaon farmer) एका शेतकऱ्याने एकरभर काकडी पिकवली.  या काकडीतून शेतकऱ्याला चांगलाच नफा झाला आहे. मालेगाव तालुक्यातील दुधे येथील युवा शेतकरी अमोल रौंदळ एकरभर काकडीत अवघ्या ५० दिवसांत 'लखपती' झाले आहेत. 

मालेगाव परिसरातील रौंदळ परिवार डाळिंब उत्पादक शेतकरी म्हणून परिचित आहे. नवं काही करू या ध्येयाने वडील नानाभाऊ रौंदळ यांच्या निधनानंतर अमोल उर्फ मुन्ना यांनी काकडी पीक (Cucumber Farming) घेतले. दरवर्षी डाळिंब पिकाबरोबर टरबूज-खरबूज, मिरची अशी अनेक पिकांची लागवड केली. यंदा पहिल्यांदाच 'नाझिया' वाणाच्या एकरभर क्षेत्रात प्रयोग करून पहिल्या ५० दिवसांत दहा टन माल निघून उत्पन्न लाखावर पोहोचले.

BA पदवीधर असलेल्या मुन्नावर शेतीची जबाबदारी असून, डाळिंब शेतीचा समृद्ध अनुभव पाठीशी आहे. चार बाय दीड फूट या अंतरावर त्यांनी काकडीची लागवड केली. डाळिंब बागेसाठी असलेल्या काठीचा आधार घेऊन काकडीसाठी स्ट्रक्चर बनविले. पाणी देण्यासाठी इनलाइन ठिंबक व्यवस्था केली आहे. तारेच्या सहाय्याने बांधलेल्या स्ट्रक्चरवर काकडीचा वेल लांबविला. योग्य अंतरावर बांधणी व स्ट्रक्चर यामुळे निघणारा माल गुणवत्तापूर्ण आहे. 

व्यापारी थेट बांधावर येऊन.. 

काकडीची गुणवत्ता उत्तम असल्याने व्यापारी थेट बांधावर येऊन माल उचलतात. काकडी पिकासाठी नैसर्गिक शेणखतासह स्लरीचा वापर करण्यात येतो. काकडीचा बहार बघता अखेरपर्यंत तीस टन उत्पादन गृहीत धरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या डाळिंब शेतीत काम करून शेतीत उत्पादन घेत होते. नवनवीन प्रयोग करताना वडिलांची साथ होती. त्यांच्यानंतर आई मंगलबाई रौंदळ व भाऊ पाठबळ देतात. काकडीच्या शेतात योग्य देखभाल व वेळोवेळी खते, औषधे यामुळे उत्पदनात वाढ झाली आहे.

खर्च किती आणि कसा झाला? तर काकडीचे शेत तयार कारण्यासाठी 3 हजार रुपये, बियाणे व लागवडसाठी 5 हजार रुपये, औषधी व फवारणीसाठी 10 हजार रुपये, शेणखतासाठी 4 हजार रुपये, इनलाइन ठिबकसाठी 8 हजार रुपये, इतर मजुरी व तोडणीसाठी 10 हजार रुपये असा एकूण एकरी खर्च 40 हजार रुपये झाला. 

मार्केटमध्ये आज जे विकते, तेच आमच्या शेतात पिकते, या संकल्पनेनुसार नवनवीन प्रयोग शेतीत करावेत. बदल ही काळाची गरज आहे. ग्राहकांच्या अपेक्षा व बाजारातील अंदाज घेऊन आरोग्याच्या दृष्टीने पिके घेतल्यास कमी मेहनतीने जास्त उत्पादन शक्य होते. यातूनच शेतकरी कुटुंबाची प्रगती होईल.- मुन्ना रौंदळ, शेतकरी, दुधे

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रकृषी योजनानाशिकमालेगांव