Join us

Farmer Success Story : अवघ्या सातवी पास विनोदने भाजीपाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवलं, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:56 IST

Farmer Success Story : सातवी पास शेतकऱ्याने भाजीपाला शेतीला (Vegetable Farming) जवळ करत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बनवला आहे. 

भंडारा :  पारंपरिक पिकासोबत  अधिक उत्पन्न देणारी शेती फायदेशीर ठरू शकते. याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील विनोद चिंतामण सेलोकर या तरुण शेतकऱ्याला आला आहे. या शेतकऱ्याने भाजीपाला शेतीला (Vegetable Farming) जवळ करत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बनवला आहे. 

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील तरुण शेतकरी विनोद चिंतामण सेलोकर हा अल्पभूधारक शेतकरी असून, शिक्षण केवळ ७ वीपर्यंतच झालेले आहे. आज स्पर्धेच्या युगात नोकरीसाठी वणवण भटकण्यापेक्षा घरीच शेतीमध्येभाजीपाला पिकाचे उत्पादन (Vegetable Production) घेण्याचा निर्णय त्याने घेतला आणि तो यशस्वी करुन दाखविला.

विनोद गेल्या ८ ते १० वर्षांपासून पारंपरिक धान पिकाऐवजी भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. वांगी, मिरची, टोमॅटो, कारली व वाल यासारख्या भाजीपाला पिकांचे वर्षभर उत्पन्न घेत आहे. त्यातून चांगले उत्पन्न हाती येत असल्याचे शेतकरी विनोद सेलोकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे वर्षभर जवळपास ५ ते ६ मजुरांना नियमित काम उपलब्ध करून देत आहे. 

वडील पारंपरिक भात पीक घ्यायचे; परंतु त्यातून खर्च वजा जाता फारसे उत्पन्न मिळत नसल्याने ते परवडत नव्हते. त्यामुळे अन्य पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय विनोद सेलोकर यांनी घेतला. पारंपरिक धान पिकाला बगल देऊन शेतीतून नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने भाजीपाला पिकांचे उत्पादन काढण्याचे त्याने ठरविले.

६ लाखांचा शुद्ध नफा शेतात पिकविलेला माल भंडारा येथील बीटीबी मंडीमध्ये तसेच आजूबाजूच्या गावांतील बाजारांमध्ये स्वतः बसून किरकोळ भाजीपाला विकतो. गेल्या ६ महिन्यांच्या काळात केवळ ३ एकरांत ६ लाखांचा नफा मिळविला. त्यासाठी तीन लाख रुपये एवढा खर्च आला. 

मल्चिंग पेपरचा वापर व ठिबक सिंचनाद्वारे औषधी सर्वप्रथम शेतीमध्ये पाण्याची सोय करून त्यात ठिबक सिंचनाची सोय केली. तसेच कचरा होऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर व ठिबक सिंचनाद्वारे औषधी देण्याची सोय केली. यावर्षी 3 एकरामध्ये वांगी मिरची, टोमॅटो, कारली व वाल या भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली असून उत्पन्न हाती येणार आहे.

भात पिकापेक्षा भाजीपाला पीक कधीही फायदेशीरच ठरते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य नियोजन करून मजुरांसोबत स्वतः मेहनत घेतली पाहिजे. जेणेकरुन अपेक्षित उत्पन्न हाती येईल. - विनोद सेलोकर, शेतकरी

टॅग्स :भाज्याशेती क्षेत्रशेतीकृषी योजनाभंडारा