Join us

Dairy Farming : शेलूबाजार परिसरात पुन्हा उभारी घेतेय 'श्वेतक्रांती'; दरमहा लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:12 IST

Dairy Farming : शेलूबाजार परिसरात पुन्हा एकदा 'श्वेतक्रांती' चा झंकार ऐकू येतो आहे. शेतीसोबत दुग्धव्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी या ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण केले आहे. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय आज शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न, रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग दाखवत आहे. धनंजय वानखेडे यांसारख्या पशुपालकांच्या यशकथांनी संपूर्ण परिसरात प्रेरणेचा प्रवाह सुरू केला आहे. (Dairy Farming)

Dairy Farming : शेलूबाजार परिसरात हरितक्रांतीनंतर आता ‘श्वेतक्रांती’ नव्या जोमाने फुलू लागली आहे. ग्रामीण भागात शेतीखेरीज रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्ह उत्पन्नाचा आधार बनतो आहे. (Dairy Farming)

 लहान शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत सुरू होणारा हा व्यवसाय आज नव्या ग्रामीण क्रांतीचा मार्ग ठरतो आहे.(Dairy Farming)

श्वेतक्रांतीचा नवा अध्याय

१९९१ साली स्व. तुकाराम पाटील दूध उत्पादक सहकारी संस्थेमुळे शेलूबाजार परिसरात दुग्धक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांद्वारे म्हशी घेतल्या, पण नंतर खंड पडल्यामुळे दूधटंचाई निर्माण झाली. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे गावोगावी दूध कॅन फिरताना दिसतात आणि 'दूधगंगा' वाहू लागली आहे.

दोन म्हशींवरून ४० पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

शेंदुरजना मोरे येथील पशुपालक धनंजय वानखेडे यांनी केवळ दोन म्हशींनी सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ४० हून अधिक उच्च प्रतीच्या म्हशी असून, ते दररोज २०० ते २५० लिटर दूध संकलित करतात. 

उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरियाणाहून म्हशी विकत घेऊन त्यांनी व्यावसायिक पातळीवर दुग्धउद्योग उभा केला. 

प्रशिक्षित कामगारांच्या मदतीने चालविलेल्या या उद्योगातून त्यांना दरमहा दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

वानखेडे यांच्या या यशाने परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. अनेक बेरोजगार तरुण स्वतःच्या मेहनतीवर आणि कर्जाच्या सहाय्याने दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत.

ग्रामीण भागात वाहतेय 'दूधगंगा'

पूर्वी नागरिकांना दुधासाठी बाजारात जावे लागायचे, पण आता प्रत्येक गावात खाजगी डेअऱ्या सुरू झाल्या आहेत. शेलूबाजारमधून दररोज सुमारे ६ हजार लिटर तर संपूर्ण परिसरातून १ हजार  ते १ हजार २०० लिटर दूध संकलित होऊन मंगरुळपीर, कारंजा आदी ठिकाणी पाठवले जाते.

दुग्धव्यवसायाने बदलले जीवनमान

लाठी, हिरंगी, येडशी, चोरद, गोगरी, पिंप्री, तपोवन, इचा, नागी, माळशेलू, वनोजा आदी गावांमध्ये प्रत्येकी ५० ते ६० म्हशी असून दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांनाही येथे रोजगार मिळाला आहे. प्रत्येक म्हशीच्या देखभालीसाठी दरमहा १ हजार ५०० इतके वेतन देऊन काम दिले जाते. 

शासनाकडून अपेक्षित सहकार्य आवश्यक

दुग्धव्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी शासनाच्या पातळीवरून दूध दरवाढ, अनुदानित चारा, शेड बांधणीसाठी आर्थिक मदत आणि पशुवैद्यकीय सेवा सुलभ करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या 'श्वेतक्रांती'ला पाठबळ दिल्यास ग्रामीण भागात आर्थिक समृद्धीची नवीन लाट उसळू शकते.

दुग्धव्यवसाय म्हणजे रोजचा पैसा आणि दीर्घकाळ टिकणारे स्थैर्य. मेहनत आणि शिस्त राखली, तर हा उद्योग गावागावात नव्या आशेचा किरण बनू शकतो. - धनंजय वानखेडे, पशुपालक

हे ही वाचा सविस्तर : Dairy Farming : कष्टाची ताकद : कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या चंद्रकलाबाईंची दुग्ध यशकथा वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Dairy Farming Resurgence: Shelu Bazar Sees White Revolution, Lakhs in Income

Web Summary : Shelu Bazar witnesses a dairy farming resurgence, boosting rural incomes. Inspired by success stories like Dhananjay Wankhede's, villagers embrace dairy, supplying milk to nearby towns. Government support is crucial for sustained growth and prosperity.
टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायशेतीशेतकरी