Organic Onion Story : एकीकडे कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, दुसरीकडे पावसामुळे कांद्याचे होत असलेले नुकसान यामुळे खरं तर कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र या सगळ्यांवर मात करीत नाशिकच्या (Nashik) शेतकऱ्याने जवळपास ३ हजार क्विंटल ऑरगॅनिक कांदा उत्पादनाची किमया साधली आहे. विशेष म्हणजे युरोपियन स्टॅंडर्डला हा कांदा खरा उतरला असून आता युरोपियन देशांमध्ये कांदा एक्सपोर्ट होणार आहे.
सटाणा तालुक्यातील मोरेनगर येथील मधुकर मोरे (Madhukar More) शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. हे शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने कांदा उत्पादन घेत आहेत. मोरे यांची वडिलोपार्जित शेती असून गेल्या दोन ऑरगॅनिक कांदा (Organic Onion Farming) लागवड करीत आहेत. यंदाही त्यांनी जवळपास ३० एकरवर रब्बी कांदा लागवड केली होती. लागवडीपासून ते काढणीपर्यंत सेंद्रिय खतासोबत फवारणी घेतली. यामध्ये शेणखत, निंबोळी अर्क, मळी आदींचा वापर केला.
तसेच वातावरण बदल होते गेले, त्यानुसार जैविक बुरशीनाशके, कीटक नाशके वापरली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांपेक्षा कांदा उत्पादनात बदल जाणवला. एकरी १२० ते १३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे अवकाळी पावसात जवळपास ५ एकरावरील कांद्याचे नुकसानही झाले. मात्र इतर २० एकरांवरील कांद्याला वाचविण्यात यश आले. अशा रीतीने जवळपास ३ हजार क्विंटल कांदा उत्पादन झाले.
दरम्यान मधुकर मोरे म्हणाले की, 'मागच्या वर्षी रासायनिक आणि ऑरगॅनिक खतांचा वापर केला. त्यावेळी उत्पादन वाढले, मात्र आता जशी कांद्याची क्वालिटी मिळाली, तशी मिळाली नाही. म्हणूनच यंदा संपूर्णतः ऑरगॅनिक पद्धतीने कांदा पिकवला, उत्पादनही वाढले, शिवाय कांद्याची क्वालिटी देखील चांगली आली. तसेच हा कांदा चवीला उत्कृष्ट आहे. मात्र रासायनिक ऑरगॅनिक पद्धतीने कांदा पिकवताना खर्च सरासरी इतकाच आल्याचे ते म्हणाले.
कांदा युरोपियन स्टॅंडर्डमध्ये पास विशेष म्हणजे हा कांदा BLQ चाचणीसाठी मे महिन्यात पाठवण्यात आला होता. या चाचणीत कांदा पास झाला आहे. लॅब रिपोर्टसहित युरोपियन स्टॅंडर्ड नुसार रिपोर्ट BLQ आला असून आता युरोपियन देशांमध्ये कांदा एक्सपोर्ट करता येणार आहे.
अलीकडे रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. रासायनिक शिवाय पिकणार नाही, हा गैरसमज दूर व्हायला हवा. दोन वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकवतो आहे. कांदा क्वालिटी आणि साईज अतिशय चांगली आहे. शिवाय दोन महिन्यापासून कांदा चाळीत साठवला असून कांदा जसा आहे, तसाच आहे. कुठेही खराब झालेला नाही. शिवाय चाळीने लेव्हल सोडलेली नाही, पट्टी सोडलेली नाही. सध्या बाजारात हवा तसा भाव नाही. ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत विक्री करणार आहोत. - मधुकर मोरे, कांदा उत्पादक शेतकरी, निफाड