राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
शासन निर्णय क्र.पीकस्पर्धा २०२०/प्र.क्र.११३/४अे, दि.२० जुलै २०२३ अन्वये रब्बी हंगाम २०२४ मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पीकस्पर्धेतील समाविष्ट पिकेज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ०५ पिके) पात्रता निकष१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.२) स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.३) पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन.३) ७/१२, ८-अ चा उतारा.४) जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीखरब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस : ३१ डिसेंबर
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्कपीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.
बक्षिस स्वरुपतालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धा पातळी | पहिले | दुसरे | दुसरे |
तालुका पातळी | ५,००० | ३,००० | २,००० |
जिल्हा पातळी | १०,००० | ७,००० | ५,००० |
राज्य पातळी | ५०,००० | ४०,००० | ३०,००० |
वरील बक्षिस रक्कम सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी सारखीच राहील.
उपरोक्त नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधु-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळला भेट द्यावी.
अधिक वाचा: लाटवडेच्या शंकर पाटलांनी ऊस शेतीत केला ५५ कांड्याच्या उसाचा नवा रेकॉर्ड.. वाचा सविस्तर