Draksh Kadhani : यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादकांसाठी जिकिरीचा ठरला आहे. तरी देखील शेतकरी मोठ्या मेहनतीने द्राक्ष काढणी करीत आहेत. द्राक्ष काढणी वेगात सुरु आहे. या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. द्राक्ष - फळकाढणीची तयारी नेमकी कशी करायची, हे समजून घेऊयात...
फळकाढणीची तयारी
- वाढत्या तापमानात फळकाढणी करणे म्हणजे मण्याची प्रत बिघडविणे होय.
- काढणीनंतर द्राक्षाची निर्यात किंवा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याचे नियोजन करताना द्राक्षमण्यांची प्रत टिकून राहणे अत्यंत आवश्यक असते. द्राक्षमण्यातील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असलेली अवस्था म्हणजेच 'फळकाढणीचा कालावधी' होय.
- ही परिस्थिती साधारणतः सकाळी ११ ते ११.३० काढलेल्या द्राक्ष फळांमध्ये दिसून येईल.
- यावेळी मण्यातून पाणी निघून जाण्याची शक्यता कमी असते.
- द्राक्ष फळांची प्रत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने द्राक्षघडाची हाताळणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
- फळकाढणी करताना हातमोजांचा वापर, द्राक्षघड क्रेटमध्ये एकामेकांवर पडणार नाहीत अशा प्रकारे ठेवणे म्हणजेच फळांची हाताळणी होय.
- घडाच्या मण्यावर कोणतीही इजा होऊ नये, याकरिता क्रेटच्या तळामध्ये कुशनिंग करणे गरजेचे आहे.
- कुशनिंगकरिता बबलशीटचा वापर करावा. फळकाढणी झाल्यानंतर त्वरित द्राक्षघड सावलीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- फळ काढणीच्या एक ते दोन दिवस आधी घडातील सुकलेले मणी, तडे गेलेले मणी, करप्याचे डाग असलेले मणी काढून घ्यावेत.
- जेणेकरून फळकाढणीच्या वेळी चांगल्या प्रतिची द्राक्ष उपलब्ध होतील.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
