Kanda Kadhani : कांदा पिक हे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) प्रमुख पिक असून खरीप, रांगडा आणि रब्बी अशा तिन्ही हंगामामध्ये कांद्याची लागवड (Kanda Lagvad) कमी अधिक प्रमाणात होत असते.
त्यापैकी खरीप आणि रांगडा हंगामातील कांदा वगळता रब्बी (उन्हाळ) कांद्याची साठवणूक शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. वर्षभर ग्राहकाला कांदा सहज उपलब्ध होण्यासाठी काढणी पश्चात व्यवस्थापनावर शेतकरी बांधवांनी भर देऊन साठवण क्षमता वाढवणे आवश्यक आहे.
कांदा काढणी -
- हंगामनिहाय, जातीपरत्वे, कांद्याची काढणीची अवस्था वेगवेगळी असते.
- खरीपात कांदा काढणीच्या वेळी पाऊस असल्यास माना पडत नसल्याने पक्वतेची ठळक लक्षणे आढळून येत नाहीत.
- साधारणतः ३० ते ४० टक्के माना पडल्यानंतर कांदा काढणीस तयार झाला आहे असे समजावे. हि लक्षणे रब्बी हंगामातील कांदा लागवडीमध्ये आढळून येतात.
- कांदा पक्व होऊ लागल्यावर नवीन पाने येण्याची थांबतात, तसेच पातीतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो.
- कांद्याच्या मानेचा भाग मऊ होऊन पाने मानेजवळ वाकून जमिनीवर पडतात यालाच माना पडणे असे म्हणतात.
- कांदा काढणीच्या अंदाजित २० दिवस आधी पाणी पुरवठा बंद करावा.
- कांद्याची मान आणि आकारमान बघून काढणीचा अंदाज घ्यावा.
- पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा.
- माना जास्त वाळल्यानंतर काढणी केल्यास कांदा उपटतांना तुटतो, त्यामुळे कांदा खणून काढावा लागत असल्याने खर्च वाढतो. शिवाय कांद्याला जखमा होईन असा कांदा साठवणुकीसाठी अयोग्य असतो.
कांदा सुकविणे -
- कांदा काढल्यानंतर शेतात ३ ते ४ दिवस अशा पद्धतीने सुकवावा की दुसऱ्या ओळीने पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकावा.
- या पद्धतीने ३-४ दिवस साठवणूक केलेल्या कांद्याची पूर्ण सुकलेली पात ३ ते ४ सें.मी. लांब नाळ ठेवून कापावी.
- पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करून जोडकांदा, डेंगळे आलेला कांदा आणि चिंगळी कांदा विवडून वेगळा करावा.
- चांगला कांदा एकत्र गोळा करून सावलीत ढीग घालून १० ते १५ दिवस राहू द्यावा.
- रब्बी हंगामात कांद्याची साठवणूक सावलीत ढीग घालून तात्पुरती करता येते. परंतु कांदा मे-जून महिन्यात उशिरा निघत असल्याने अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाळा लक्षात घेता होणारे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठवणुकीसाठी संरक्षणात्मक तात्पुरती व्यवस्था करावी.
- पवन मधुकर चौधरी, विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिकस्त्रोत - भा.कृ.अ.प.- कांदा आणि लसूण संशोधन संचलनालय, राजगुरुनगर, पुणे