Amba Mohor Protection : आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होताच त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.
कोळी कीटकासह भुरी (Powdery Mildew) रोगाचा हल्ला झाल्याने मोहराचे देठ, फुले तसेच लागलेली लहान फळे गळत असून, यामुळे फळधारणा मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, वेळेवर व्यवस्थापन न केल्यास आंबा उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे.
भुरी रोगामुळे मोहरावर गंभीर परिणाम
भुरी हा आंबा पिकातील सर्वांत नुकसानकारक रोग मानला जातो. ओइडिअम मेन्जिफेरी या बुरशीमुळे होणारा हा रोग मोहर फुटण्याच्या काळात अधिक प्रमाणात आढळतो. या रोगामुळे मोहराचे देठ, फुले व लहान फळांची गळ होते. परिणामी फळांची धारण कमी होऊन उत्पादनावर थेट विपरीत परिणाम होतो.
भुरी रोगाच्या बुरशीची बीजे कोवळ्या मोहोरावर व पालवीवर उगवतात. ही बुरशी पेशींमध्ये शिरून अन्नरस शोषते.
सुरुवातीला रोगाचा प्रादुर्भाव मोहोराच्या शेंड्यापासून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण मोहोरावर पसरतो. पांढरट रंगाची भुकटी फवारल्यासारखी बुरशी दिसून येत असल्याने या रोगाला भुरी असे नाव देण्यात आले आहे. वाऱ्यासोबत या बुरशीचा वेगाने प्रसार होतो.
कोळी कीटकाचा मारा
आंब्याच्या मोहोरावर रसशोषक किडींमध्ये तुडतुडे, फुलकिडे आणि कोळी या प्रमुख नुकसानकारक किडी आहेत. त्यापैकी कोळी हे आकाराने अतिशय लहान व लालसर रंगाचे असल्याने उघड्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत.
पानांच्या मागील बाजूस त्यांनी तयार केलेल्या बारीक जाळ्यांखाली राहून हे कोळी पानातील रस शोषतात. त्यामुळे पाने तेलकट, तांबूस होऊन अर्धवट वाळतात व पुढे मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. मोहोरावर या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ होते.
ढगाळ वातावरणामुळे धोका वाढला
सध्या ढगाळ हवामान, थंडी, ऊन आणि मधूनच पाऊस असा वातावरणाचा बदलता क्रम सुरू आहे. याच काळात आंब्याला मोहर येत असल्याने रोग व किडींसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुरुवातीच्या अवस्थेतच नियंत्रण न केल्यास नुकसान अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
आंबा पिकाचे योग्य व्यवस्थापन गरजेचे
कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आंबा लागवड कोरड्या हवामानाच्या भागात करावी. झाडांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी नियमित छाटणी करावी तसेच वाढलेले गवत व झुडपे काढून टाकावीत.
रोगग्रस्त भाग वेळीच काढून नष्ट करावेत. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी बॅसिलस लिचेनिफोर्मिस या जैविक बुरशीनाशकाची फवारणी केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
कोळी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात अनियमितता टाळून झाडांची योग्य निगा राखल्यास नुकसान टाळता येईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
आंबा मोहोर संरक्षणासाठी उपाययोजना
सांस्कृतिक उपाय
* झाडांची नियमित छाटणी करून हवा खेळती ठेवा.
* झाडाखालील तण व वाढलेले गवत काढून टाका.
* रोगग्रस्त मोहोर, पाने व फांद्या काढून नष्ट करा.
* पाणी साचू देऊ नका; निचऱ्याची व्यवस्था ठेवा.
हवामानानुसार विशेष काळजी घ्या
* ढगाळ व दमट वातावरणात फवारण्या वेळेवर करा.
* सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करावी.
* पावसानंतर फवारणी टाळू नका.
महत्त्वाच्या सूचना
* औषधे एकत्र मिसळताना काळजी घ्या.
* फवारणी करताना संरक्षण साधने वापरा.
* स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधे वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोहोर फुटण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रण केल्यास ७०-८० टक्के नुकसान टाळता येते आणि आंबा उत्पादन टिकवता येते.
Web Summary : Mango blossoms are under attack from pests and diseases like powdery mildew. Experts warn of significant yield loss if timely action isn't taken. Implement cultural practices, monitor weather, and consult experts for appropriate treatments to safeguard your crop.
Web Summary : आम के बौर पर भभूतिया रोग जैसे कीटों और रोगों का आक्रमण हो रहा है। विशेषज्ञों ने समय पर कार्रवाई न करने पर उपज में भारी नुकसान की चेतावनी दी है। अपनी फसल को बचाने के लिए सांस्कृतिक प्रथाओं को लागू करें, मौसम की निगरानी करें और उचित उपचार के लिए विशेषज्ञों से परामर्श करें।