Kharif Season : खरीप हंगाम सुरू झाला असून मशागतीची (Cultivation) लगबग सुरू आहे. अजूनही बैलांच्या साहाय्याने, औताच्या साह्याने मशागती केल्या जातात. बैलांच्या साहाय्याने करण्यात येणारी शेतीची कुठलीही कामे असोत अनेकदा तुम्ही बैलांच्या तोंडाला मुस्के बांधलेले पाहिले असेल. तर हे मुस्क का बांधले जाते? त्याचा उद्देश काय? याबाबत प्रा. शिक्षक तथा लेखक, कवी लक्ष्मण खेडकर यांनी अनुभव सांगितलाय....
कोऱ्या वावरात बैलांना मुस्के (मुंगसे) बांधून औत हाकलं. जे केलं ते अनेकांना चुकीचं, गैरलागू वाटलं, काही मित्र म्हणाले, "यामुळे बैलाला धाप लागते, बैलांना श्वास घ्यायला त्रास होतो. तर काहीच म्हणणं होत, पिकात बैल हाकतांना मुस्के वापरणं ठिकय. पण शेतात काही ही पेरलेलं नसतांना, पिक उभं नसतांना मुस्के बांधून बैल हाकणे चुकीच आहे.
एका अर्थाने वरकरणी काही अंशी त्यांचं खर असलं तरी मुस्के बांधून बैलं हाकले म्हणजे बैलांना श्वास घ्यायला त्रास होतो, असं म्हणणं चुकीच आहे. बैलाच्या तोंडाला मुस्के बांधल्याने त्यांना श्वास घ्यायला फारसा त्रास वगैरे होत नाही. तोंडाला मुस्के असल्यामुळे त्यांना काही खाता येत नाही, खाण्यासाठी ते आढेवेढे घेत नाहीत. काम वेळेत होत मुस्के घालण्यमागं ही हाच उद्देश असतो. मुद्दाम बैलांना त्रास देण्यासाठी हे केलं जात नाही. को-या रानात म्हणजे पिक नसलेल्या शेतात मुस्के बांधायची गरज का? तर, इतर ठिकाणासारखे दोन शेताच्या मधले बांध फक्त वाटणीच्या खुणा वगैरे दाखवण्यापुरते नसतात तर दोन शेताच्या मध्ये चार-पाच फुट रूंदीचे बांध असतात. तुमच्याकडं एवढे रूंद आणि मोठाले बांध कशासाठी लागतात? असं ही कुणाला वाटू ही शकत? तर त्याला काही भौगोलिक कारण आहे. माळरानाच्या शेताला बांध मोठंमोठे असतात, कारण पावसाच्या पाण्यासोबत शेतातली माती वाहून जाऊ नये म्हणून हे असं केलेलं असते. बांध मोठे असल्यामुळे पाऊस पडल्यावर त्यावर मोठ्याप्रमाणात गवत उगते. शेतीची मशागत करतांना ते गवत खाण्यासाठी बैल आढेवेढे घेतात. त्यामुळे अनेकदा वळ पडतं. तास सरळ येत नाही, ढोलफाटे पडतात. प्रत्येकचं वेळी बांधाला वळीतांना बैलं वळ पाडायला लागले तर ते पुर्ववत करण्यास, बैल हटवण्यास येठाण जू सरळ करण्यात बराच वेळ जातो. एकचं गोष्ट वारंवार होऊ लागली की त्याचा त्रासही ही होतो. म्हणून माणूस त्यावर काही ना काही तरी उपाययोजना करतो. मार्ग काढतो. म्हणून कोऱ्या वावरात औत हाकतांना बैलाला मुस्के घालून औत हाकले.
- लक्ष्मण खेडकर, प्रा. शिक्षक तथा लेखक, मुंगुसवाडे