Join us

फळे एवढी स्वस्त का झाली? काय मिळताेय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:00 IST

फळउत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड, बाजार समितीमध्ये अंजिर, अननसाचा भाव पडला...

थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याबरोबर फळांच्या मागणीत घट झाली आहे. याचा परिणाम फळांच्या भावावर झाला असून सरासरी ४० ते ५० रुपये किलो दराने शहरात विविध फळांची विक्री होत आहे. थंडीच्या काळात फळांच्या सेवनाने सर्दी, खोकला असे आजार होण्याचा संभव असतो. यामुळे दरवर्षीच हिवाळ्याच्या दिवसांत फळे स्वस्त होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, केळी, सफरचंद व डाळिंब असे मोजके फळ सोडता इतरांचे भाव घसरले आहेत.

थंडीत मागणी कमी

हिवाळ्यात थंड पदार्थाची मागणी दरवर्षी घटते. याही वर्षी काही दिवसांपासून थंडीत वाढ झाल्यापासून फळांची मागणी घटली आहे. यामुळे फळे स्वस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे केळी, ऊस अशा पिकांचे उत्पादन घटले

केळी भाव खाऊ लागली

 दरवर्षी या दिवसांत मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असते, यामुळे भावदेखील कमी असतात. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने केळी उत्पादनदेखील घटले असून केळी ४० पासून ५०-५५ रुपये डझन विक्री होत आहे.

व्यापारी काय म्हणतात..

सध्या केळी, सफरचंद, अंजीर असे मोजकेच फळ सोडता इतर सर्व फळांचे भाव कमी झाले आहे. शहरात पपई, पेरू, चिकू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. मात्र हिवाळ्याचे वातावरण असल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. - मुख्तार बागवान, व्यापारी, बीड

हिवाळ्यात विविध फळांची आवक वाढते. मात्र मागणी कमी असते. यामुळे या दिवसांत भाव घसरतात. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जास्त दिवस हिवाळा राहणार नाही असा अंदाज आहे. यामुळे उन वाढल्यानंतर फळांचे भावदेखील वाढतील. - सय्यद समीर, व्यापारी, बीड

अंजीराला काय मिळतोय भाव?

पुण्यात आज ५७ क्विंटल अंजिर दाखल झाला होता. प्रतिक्विंटल ४००० ते ७००० दरम्यान भाव मिळाला.तर मुंबई फळबाजारात अंजिराला प्रतिक्विंटल सरासरी ६५०० दर मिळाला.

अननसाला मिळतोय एवढा भाव

मुंबई पुण्याच्या फळ बाजारात ४०००-४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर सांगलीत केवळ १०४२ प्रतिक्विंटल दर मिळाला.

टॅग्स :फळेबाजारमार्केट यार्ड